नागपूर : भारतावर अनेक देशांची वाईट नजर आहे. काश्मीर अशांत ठेवण्याच्या दृष्टीने दहशतवादाच्या मदतीसाठी आखाती देशांमधून फंडिंग केले जात असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज येथे दिली. काश्मीर प्रश्नाला आता धार्मिकतेकडे वळवून प्रश्न अधिक क्लिष्ट करण्याचे प्रयत्न सुरू असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
सी. मो. झाडे झाडे फाउंडेशनतर्फे संचालित सत्यनारायण नुवाल गुरकुल व्यसनमुक्ती केंद्रातर्फे दिला जाणारा डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार रविवारी संजय नहार यांच्या सरहद संस्थेला प्रदान करण्यात आला. साई सभागृहात आयोजित या पुरस्कार वितरण सोहळ्यात रविवारी ते बोलत होते. खासदार कृपाल तुमाने अध्यक्षस्थानी होते. महापौर नंदा जिचकार, आमदार बाळू धानोरकर, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर, संजय नहार, सर्वोदयी विचारवंत ऍड. मा. म. गडकरी, सामाजिक कार्यकर्ते रवी कालरा, फाउंडेशनचे अध्यक्ष विकास झाडे व्यासपीठावर उपस्थित होते. एक लाख रुपये रोख, शाल, मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
कृतिशील संतांच्या भूमीकडून गौरव झाल्याचा आनंद आहे. काश्मीरमध्ये शांतता नांदावी ही प्रत्येकाचीच भावना आहे. त्याच भावनेला मिळालेला हा पुरस्कार मिळाला आहे. काश्मीर भारताचा आहे, यापेक्षा देश काश्मीरचा आहे हे कृतीतून सांगितल्यास प्रश्न मिटेल. काश्मीरमध्ये इसीस शिरकाव करीत असून फुटीरतावादी नेतेसुद्धा त्यामुळे धास्तावले आहेत.
- संजय नहार
सरहद, पुणे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.