वर्षभरात १९ नक्षल्यांचा खात्मा 

वर्षभरात १९ नक्षल्यांचा खात्मा 

गडचिरोली - जिल्ह्यासह चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यात पसरलेला माओवाद संपुष्टात आणण्यासाठी पोलिसांनी २०१७ मध्ये वर्षभर केलेल्या कारवाईत १९ माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले, तर ६७ माओवादी व समर्थकांना अटक करण्यात यश मिळाले. २२ माओवाद्यांनी शरणागती पत्करल्यामुळे माओवादी चळवळीला मोठा हादरा बसला आहे.

देशाच्या अंतर्गत सुरक्षेला मोठे आव्हान असलेली माओवादी चळवळ महाराष्ट्रात १९८० च्या दशकात सुरू झाली. सुरुवातीला राज्याच्या गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ आणि नांदेड या सहा जिल्ह्यांत कार्यरत असलेला माओवाद आता केवळ गडचिरोली जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्यातील काही तालुक्‍यांपुरताच मर्यादित आहे. पोलिसांच्या यशस्वी रणनीतीमुळे २०१७ या वर्षात माओवादी चळवळीची मोठी हानी झाली आहे. या वर्षात एकूण १९ माओवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले, तर वर्षभरात ३ पोलिस हुतात्मा झाले. पोलिसांनी ६७ माओवादी व त्यांच्या समर्थकांना अटक करण्यातही यश मिळविले असून २२ माओवादी पोलिसांना शरण आले. विशेष म्हणजे, १८१ गावांनी गावबंदी ठराव करून माओवाद्यांना गावाबाहेरच रोखल्यामुळे माओवाद्यांचा जनाधार ओसरला. या वर्षात मोठ्या प्रमाणावर माओवादी मारले गेल्यामुळे माओवाद्यांचे संख्याबळही कमी झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिसांच्या यशस्वी अभियानामुळे माआवोद्यांचा मुख्य गड असलेल्या अबुझमाड जंगलातील शिबिर उद्‌ध्वस्त झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यांमध्ये स्थानिक गावकऱ्यांनी माओवाद्यांचे बॅनर, माओवादी नेत्यांचे पुतळे जाळल्याने उरलेला जनाधारही कमी झाला आहे. 

विकासाला होकार
गावकऱ्यांनी शासनाच्या विकासाला होकार व माओवाद्यांना नकार दिला आहे, असे मत माओवादविरोधी अभियानाचे प्रमुख तथा विशेष पोलिस महानिरीक्षक शरद शेलार यांनी व्यक्‍त केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com