कचऱ्यापासून वीज निर्मितीतून खासगी कंपनीचे उखळ पांढरे

कचऱ्यापासून वीज निर्मितीतून खासगी कंपनीचे उखळ पांढरे

कचऱ्यापासून वीज निर्मितीतून खासगी कंपनीचे उखळ पांढरे
नागपूर : महापालिकेने कचऱ्यातून वीजनिर्मिती प्रकल्प अंमलबजावणीसाठी खासगी कंपनीसोबत करार केला असून यातून या कंपनीचेच उखळ पांढरे होणार असल्याचे दिसून येत आहे. महापालिका कचऱ्याच्या प्रक्रियेसाठी प्रतिटन 225 रुपये कंपनीला देणार असून तयार झालेली वीज महापालिकेला नव्हे तर महावितरणला विकली जाणार आहे. पुढील तेरा वर्षांपर्यंत प्रतिवर्ष 65 कोटी रुपये व वीज दोन्ही या कंपनीच्या घशात ओतले जाणार असल्याने आर्थिक संकटातील महापालिकेला आणखी एक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
भांडेवाडी येथे 10 एकर जागेवर होऊ घातलेल्या कचऱ्यातून वीजनिर्मिती प्रकल्पातून कचऱ्यावरील प्रक्रियेचा प्रश्‍न सुटणार आहे. मात्र, यातून पुढील तेरा वर्षे महापालिकेला एक रुपयाही मिळणार नाही. त्यानंतर हा प्रकल्प खासगी कंपनीकडून महापालिकेला हस्तांतरित करण्यात येणार आहे. प्रकल्पाचे बांधकाम पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये पूर्ण होऊन डिसेंबरपासून वीजनिर्मितीस प्रारंभ होणार आहे. या प्रकल्पात कचऱ्यापासून 11.5 मेगावॉट वीजनिर्मिती होणार आहे. ही वीजनिर्मिती करण्यासाठी या खासगी कंपनीकडून दररोज 800 टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी महापालिका या खासगी कंपनीला 225 रुपये प्रतिटन दरानुसार कचरा प्रक्रियेसाठी पैसा देणार आहे. महापालिका दररोज या कंपनीला 1 लाख 80 हजार रुपये देणार आहे. अर्थात वर्षाला 65 कोटी 70 रुपयांचा भुर्दंड महापालिकेवर पडणार आहे. विशेष म्हणजे महापालिकेची आर्थिक स्थिती पुढील काही वर्षात आणखी बिघडण्याची शक्‍यता आहे. त्यात आता या 65 कोटींचाही भार महापालिकेला वहन करावा लागणार आहे. याशिवाय या प्रकल्पातून तयार होणारी वीज ही खासगी कंपनी महावितरणला सात रुपये प्रतियुनिट दराने विक्री करणार आहे. अर्थात महापालिकेला वीज विक्रीतून कुठलाही वाटा मिळणार नाही. पुढील 13 वर्षांपर्यंत ही कंपनी महापालिकेकडून पैसे घेणार असून वीजही देणार नाही. 13 वर्षांनंतर प्रकल्प महापालिकेला हस्तांतरण करण्यात येईल. तोपर्यंत प्रकल्प किती टक्के कार्यान्वित राहणार? असा प्रश्‍न असून एकप्रकारे खासगी कंपनीचे उखळ या प्रकल्पातून पांढरे होणार असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.
तीनशे टन कचऱ्याचा प्रश्‍न कायम
या वीजनिर्मिती प्रकल्पात दिवसाला 800 टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. अर्थात महापालिकेची ही डोकेदुखी कमी होणार आहे. परंतु, शहरातून दिवसाला अकराशे टन कचरा गोळा केला जात असून तीनशे टन कचऱ्यावर प्रक्रियेचा प्रश्‍न कायम राहणार आहे.
भूगर्भ दूषित होण्याची शक्‍यता
या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात राख तयार होणार असून ती जमिनीत पुरली जाणार आहे. विविध प्रकारच्या कचऱ्याची राख जमिनीत जाणार असल्याने भूगर्भातील पाणी दूषित होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे भांडेवाडीवासींना आणखी एका समस्येला तोंड द्यावे लागण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com