आनंदवार्ता! कन्हानमधून बोगदा; सरकारची मंजुरी

file photo
file photo

नागपूर : मध्यप्रदेशातील चौराई धरणामुळे महाराष्ट्रातील पेंच प्रकल्पासंबंधात निर्माण झालेल्या गंभीर पाणीटंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी जलसंपदा विभागातर्फे मध्यप्रदेशातील लोहघोगरी गावाजवळून कन्हान नदीतून बोगद्याद्वारे दहा टीएमसी पाणी तोतलाडोह जलाशयात वळवण्याच्या 2 हजार 864 कोटींच्या प्रस्तावाला शासनाने मान्यता दिली होती. त्या संदर्भातील शासकीय परिपत्रक शासनाने आज जारी करून मान्यतेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
मध्यप्रदेशातील चौराई धोरणामुळे पेंच नदीवरील तोतलाडोह धरणात येणारे पाणी येणे कमी झाले आहे. सन 2016-17 मध्ये चौराई बांधण्यात आले. तेव्हापासून नागपूर व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळेनासे झाले व नागपूर शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. दरम्यान, शेतकरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही भेटले. त्यांच्याकडेही शेतकऱ्यांनी पाणीटंचाईबद्दल व सिंचनाबद्दल चिंता व्यक्त केली होती. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व या भागातील आमदारांनी दीर्घ काळापासून पाणीटंचाई व सिंचनावर तातडीने योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर, भंडारा परिसरातील शेतकऱ्यांची व नागरिकांची मागणी व भावना लक्षात घेता सकारात्मक भूमिका घेऊन या निर्णयाला मान्यता दिली. भंडारा-नागपूर परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा हा निर्णय असून नागपूर शहराची पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. योजनेच्या संपूर्ण खर्चासाठी विशेष अतिरिक्त नियतव्यय नगरविकास विभागास उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच सदर योजनेस प्रशासकीय मान्यता जलसंपदा विभागाने द्यावी, वित्त विभागाने हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आवश्‍यक निधी 3 वर्षांच्या कालमर्यादेत नगरविकास विभागाला उपलब्ध करून द्यावा, असेही आदेशात नमूद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com