Vidhan Sabha 2019 "गोसेखुर्द'ग्रस्तांच्या पाठिंब्याबाबत संशय

File photo
File photo

भंडारा : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी अनेकदा आंदोलने झालीत. प्रत्येक निवडणुकीत त्यांना आश्‍वासने दिली जातात; पण नंतर ती सोईस्कररीत्या विसरलीही जातात. त्यामुळे अनेकदा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचेही निर्णय घेतले गेले. पण, आता गोसेखुर्द संघर्ष समितीने एकाच उमेदवाराला समर्थन देण्याचे ठरविले आहे. मात्र, त्याचा फायदा वा तोटा कुणाला झाला वा काहीच परिणाम झाला नाही, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
विधानसभा निवडणुकीत भंडारा विधानसभा क्षेत्रातून 14 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी एकच उमेदवार प्रकल्पग्रस्तांच्या समस्या चांगल्या प्रकारे सोडवू शकतात, असे समजून त्यालाच समर्थन देण्याचा गोसेखुर्द संघर्ष समितीचा निर्णय सारेच प्रकल्पग्रस्त मान्य करतील काय व जिल्ह्यात बहुसंख्येने असलेले प्रकल्पग्रस्त या निवडणुकीत एकवटणार काय, असा प्रश्‍न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
गेल्या 35 वर्षांपासून पवनी तालुक्‍यातील गोसेखुर्द येथे राष्ट्रीय प्रकल्पाचे काम सुरू आहे. भंडारा व पवनी तालुक्‍यातील 32 गावे या धरणाच्या बुडीत क्षेत्रात आल्याने त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी पुनर्वसन केले. या प्रकल्पग्रस्तांना तत्कालीन शासनाने कमी मोबदला देऊन शेती, घरांचे संपादन केले. नवीन गावठाणात जीवनावश्‍यक सुविधांचा अभाव, रोजगार व नोकऱ्यांचा अभाव, पर्यायी जमिनी दिल्या नाहीत, अशा एक ना अनेक कारणांमुळे प्रकल्पग्रस्तांनी वारंवार आंदोलने केली आहेत.
यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीसह अनेकदा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने मतदान झालेच नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या समस्या शासनासमोर मांडायला कोणताच लोकप्रतिनिधी मिळाला नाही. तसेच निवडून आलेले आमदार व खासदारांनी आश्‍वासन देण्यापलीकडे कोणताही विषय शासन दरबारी लावून धरला नाही. त्यामुळे आता गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याऐवजी आपला उमेदवार निवडून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी निवडणूक रिंगणातील एका उमेदवाराला समर्थन देण्याचे घोषित केले. भंडारा विधानसभेतील प्रकल्पग्रस्तांची लोकसंख्या एक लाखापेक्षा अधिक आहे. परंतु, संघर्ष समितीच्या निर्णयाला युवक, वृद्ध, महिला असे वेगवेगळ्या वयोगटांतील मतदार किती महत्त्व देतात, यावर निवडणुकीचे गणित अवलंबून आहे.

"अड्याळ तालुका'वाले मौन
लोकसभा निवडणुकीदरम्यान अड्याळ तालुका निर्मितीच्या प्रश्‍नाला कोणत्याही सरकारने सोडविण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे अड्याळकरांसह परिसरातील गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. नंतर मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेअंती मतदान करण्याऱ्यांना विरोध करणार नाही, असा पवित्रा अड्याळ तालुका निर्मिती समितीने घेतला होता. परंतु, या निवडणुकीदरम्यान तालुका निर्मिती समितीचे पदाधिकारी व गावकरीही गुपचूप आहेत. त्यामुळे त्यांचे मतपरिवर्तन झाले की काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com