पालकमंत्र्यांची अकोला जिल्ह्यात राजकीय मोट

bacchu kadu
bacchu kadu

अकोला : पालकमंत्री म्हणून नियुक्ती होताच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अकोल्यात नव्याने राजकीय मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी प्रहार व प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीसह सर्व आघाड्या सोमवारी बरखास्त करण्यात आल्यात. नव्याने संघटन बांधणीसह नवीन कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

अकोला जिल्ह्यात ‘व्हिझन’ असणाऱ्या नेत्यांची मोठी दरी आहे. जिल्ह्याचा विकास रखडण्यामागे हे प्रमुख कारण आहे. ही दरी भरून काढणारा नेता जिल्ह्यात उदयास येऊ शकला नाही. राजकीय पक्षांमधील अंतर्गत मतभेद आणि स्वतःची पोळी शेकून घेणाऱ्या नेत्यांचाच येथे सुळसुळाट आहे. अशा परिस्थितीत अकोल्याला मिळालेले पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडून सर्वांनाच फलश्रुतीची अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत जिल्ह्यात काम करण्यासाठी जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते व मोठे नेते तयार आहेत.

पालकमंत्री बच्चू कडू यांनाही अकोला जिल्ह्यात पक्ष संघटन वाढविण्याच्या दृष्टीने मिळालेली ही सुसंधीच आहे. त्यामुळे त्यांनी जिल्ह्यात राजकीय मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी सर्वप्रथम त्यांनी प्रहार व प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हा कार्यकारिणी आणि सर्व आघाड्या बरखास्त केल्या आहेत. हा निर्णय प्रहार जनशक्ती पक्षाच्या सोमवारी शासकीय विश्राम गृहात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बबलू जवंजाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सर्व आघाड्या बरखास्तीचा आदेश देण्यात आला.


प्रभारही देण्यास नकार
प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांनी नवीन कार्यकारिणी जाहीर होईपर्यंत प्रभार देण्याची मागणी केली होती. मात्र प्रदेशाध्यक्षांनी ती फेटाळून लावली.


नवीन फळी तयार करणार
पालकमंत्री बच्चू कडू यांच्यासोबत अकोला जिल्ह्यात काम करण्यासाठी राजकीय क्षेत्रातील काही मोठी नावे पुढे येत आहेत. त्यांनी बच्चू भाऊंसोबत काम करण्याची तयारी दर्शविली असून, प्रहार जनशक्ती पक्षाचा कारभार त्यांच्या खांद्यावर सोपविण्याच्या दृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे.


निवडणूक निकालांचा परिणाम
नुकत्याच झालेल्या विधानसभा व त्यानंतरच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाला जिल्ह्यात कोणतेही उल्लेखनीय यश मिळाले नाही. त्याचा आढावा घेतला असता पक्ष संघटनेतील हेवेदावे आणि कमकुवत नेतृत्वामुळे पक्ष जिल्ह्यात वाढीसाठी मर्यादा असल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्हा कार्याकारिणीसह सर्व आघाड्या बरखास्त करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला.


जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा आढावा घेतल्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हा कार्याकारिणीसह सर्व आघाड्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. कुणाकडेही प्रभार नाही. लवकरच नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल. बच्चूभाऊंची पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर जिल्ह्यातील काही मोठे नेते पक्षासोबत काम करण्यास तयार आहेत. त्यांना सोबत घेवून पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न केले जातील.
बबलू जवंजाळ, प्रदेशाध्यक्ष, प्रहार जनशक्ती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com