आरोग्यसुविधा अधिक बळकट होतील - मुख्यमंत्री

वर्धा - शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी सेंटरच्या उद्‌घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, दत्ता मेघे, खासदार तडस, आमदार अरुण अडसड, समीर कुणावार, समीर मेघे, सागर मेघे आदी मान्यवर.
वर्धा - शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी सेंटरच्या उद्‌घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, दत्ता मेघे, खासदार तडस, आमदार अरुण अडसड, समीर कुणावार, समीर मेघे, सागर मेघे आदी मान्यवर.

वर्धा - शिक्षण, आरोग्य व रोजगार या मूलभूत गरजा झाल्या आहेत. चांगल्या आरोग्यसुविधा मिळणे ही प्रत्येकाची गरज आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत विविध आजारांच्या उपचाराकरिता पाच लाख रुपयांपर्यंत मदत उपलब्ध करून दिल्याने सर्वसामान्य  रुग्णांना खासगी आरोग्य संस्थांद्वारे दर्जेदार आरोग्यसुविधा मिळणे शक्‍य झाले. विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून आरोग्यसेवा अधिक बळकट होतील, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. २५) सावंगी (मेघे) येथे व्यक्त केला. 

सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयांतर्गत शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी सेंटरचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी खासदार दत्ता मेघे, शालिनीताई मेघे, खासदार रामदास तडस, आमदार अरुण अडसड, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, सागर मेघे, डॉ. वेदप्रकाश मिश्रा आदींची उपस्थिती होती.   

तत्पूर्वी, श्री. फडणवीस व श्री. गडकरी यांच्या हस्ते हिंगणघाट येथील टाका मैदानावर वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील सात हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन व पायाभरणी सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, खासदार तडस, आमदार कुणावार यांची प्रमुख उपस्थिती होती. संचालन डॉ. ललित वाघमारे यांनी केले. प्रास्ताविक आमदार समीर मेघे यांनी केले. आभार सागर मेघे यांनी मानले.

डॉक्‍टरांची कमतरता - नितीन गडकरी
देशात आजही आठ लाख डॉक्‍टरांची कमतरता आहे. सरकारी रुग्णालयांची अवस्था पूर्वीपासूनच वाईट आहे. दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेच्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाने गोरगरीब, सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्यसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यात शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी सेंटरची भर पडली आहे. हे सेंटर विदर्भातील सर्वसामान्यांना अल्पदरात अत्युच्च आरोग्यसुविधा उपलब्ध करून देणार आहे. प्रामाणिकपणा, विश्‍वासार्हता, सामाजिक बांधीलकी जपत दत्ता मेघे यांनी आरोग्यसेवेचे जाळे विणले.

विदर्भाचे चित्र बदलत आहे - मुख्यमंत्री 
हिंगणघाट (जि. वर्धा) - एकेकाळी प्रचंड अनुशेष असलेल्या विदर्भाचे भविष्य बदलण्याचे आव्हान आम्ही सत्तेत येताच स्वीकारले. आम्ही या चार वर्षांत विदर्भाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आता विदर्भाचे चित्र बदलत आहे. यापुढे विदर्भातील जनता अनुशेषावर बोलणार नाही, असा विश्‍वास मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी (ता. २५) येथे व्यक्त केला. 

वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील सात हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन व पायाभरणी सोहळा येथील टाका ग्राउंडच्या मैदानावर पार पडला. मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात सर्वदूर रस्ते व पुलांचे जाळे विणण्यात येत आहे. यातून मूलभूत सुविधांना चालना मिळून विकासाला गती मिळत आहे व रोजगार निर्मिती होत आहे. चार वर्षांत मोठ्या प्रमाणात परिवर्तन झाले. हे सरकार गरिबांचे, सामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे आहे. या सर्वांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडविण्याचा आमचा मानस आहे. श्री. गडकरी म्हणाले, पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आम्ही आजवर दिलेले आहे. जनता मालक आहे आणि आम्ही सेवक आहोत, हीच भावना यामागे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com