अकोला - वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीन जिल्ह्यांना काल (ता. 16) अतिवृष्टीचा फटका बसला. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आले असून, काठावरील हजारो हेक्टरवर शेती पाण्याखाली गेली आहे. या पावसाने वऱ्हाडातील तिन्ही तालुक्यांतील जलसाठ्यात वाढ झाली.
तब्बल 20 दिवस विश्रांती घेतल्यानंतर गुरुवारी पहाटेपासून वऱ्हाडात पावसाला सुरवात झाली. सलग पाच तासांपेक्षा अधिक काळ कोसळलेल्या या पावसाने यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच नदी-नाले भरून वाहू लागले. परिणामी नदी-नाल्यांच्या काठावरील शेती पाण्याखाली जाऊन हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.
अकोल्यात 28 मंडळांत अतिवृष्टी
अकोला जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या सरासरी 85.8 मि.मी. पावसाची नोंद झाली. अकोला शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीला पूर आला होता. अकोला जिल्ह्यात अकोला, बार्शीटाकळी, पातूर आणि मूर्तिजापूर तालुक्यात अतिवृष्टी झाली.
बुलडाण्यात नऊ तालुक्यांना फटका
बुलडाणा जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच दमदार पाऊस झाला. त्याचा फटका नऊ तालुक्यांना बसला आहे. जिल्ह्यात सरासरी 82 मि.मी. पाऊस झाला. बुलडाणा तालुक्यात 123.6 मि.मी. पाऊस पडला. याशिवाय चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार, मेहकर, मलकापूर, मोताळा, जळगाव जामोद तालुक्यात अतिवृष्टी झाली.
वाशीम जिल्ह्यात अतिवृष्टी
वाशीम जिल्ह्यात गुरुवारी सर्व तालुक्यांत अतिवृष्टी झाली. सर्वाधिक फटका मानोरा आणि कारंजा तालुक्यांना बसला. जिल्ह्यात 95.71 मि.मी. पाऊस नोंदविल्या गेला. कारंजा तालुक्यात 128.57 आणि मानोरा तालुक्यात 124.30 मि.मी. पाऊस झाला. मंगरुळपीर तालुक्यात 91.29, रिसोड 73.13, मालेगाव 81.58 आणि वाशीम तालुक्यात 75.41 मि.मी. पावसाची नोंद झाली.
|