पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस

File photo
File photo

नागपूर : विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात पुरामुळे 18 मार्गांची वाहतूक प्रभावित झाली आहे. भंडारा, चंद्रपूर, गोंदियातही मुसळधार झाला. पावसामुळे पूर्व विदर्भातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आल्याने शुक्रवारी (ता. 6) तब्बल 18 मार्ग बंद होते. जवळपास पाचशेच्या वर गावांचा संपर्क तुटला असून काही गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे, तर अनेक मार्गावर ये-जा करणारे नागरिक अडकून पडले. आरमोरी तालुक्‍यातील ठाणेगाव लगत 25 जण पुरात अडकले होते. त्यांना पोलिसांनी रबर बोटीच्या साहाय्याने बाहेर
काढले. देसाईगंज लगतच्या अरततोंडी या पुनर्वसित गावाला पुराने वेढले. पोलिसांनी दोराच्या साहाय्याने 200 लोकांचा जीव वाचविला.
पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आल्याने कुरखेडा-वैरागड-रांगी, आलापल्ली-भामरागड, कमलापूर-रेपनपल्ली, आरमोरी-देसाईगंज, शंकरपूर-बोडधा, फरी-किन्हाळा, एटापल्ली-आलापल्ली, भामरागड-लाहेरी, चातगाव-पेंढरी, मानापूर-पिसेवडधा, हल्दी-डोंगरगाव, कोरची-बोटेकसा, धानोरा-मालेवाडा, चोप-कोरेगाव, वैरागड-वासाळा हे मार्ग बंद होते.

पवनी/लाखांदूर (जि. भंडारा) : दोन्ही तालुक्‍यांत काल रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने नागरिकांची चांगलीच दमछाक उडाली. अनेक गावांत घरे पाण्याखाली आली आहेत. पावसामुळे तालुक्‍यातील अनेक रस्ते बंद असल्याने संपर्क तुटला होता. तालुक्‍यातील आठ गावांना पाण्याने वेढले आहे. लाखांदूर तालुक्‍याला पहाटेपासून पावसाने झोडपून काढले. अनेक गावांतील घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तालुक्‍यात ओला दुष्काळ घोषित करण्याची मागणी होत आहे.
गोंदिया जिल्ह्यात गत तीन-चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी व शनिवारी रेड अलर्ट जारी केला आहे. अतिवृष्टीची शक्‍यता वर्तविली आहे. शुक्रवारी पहाटे चारनंतर अर्जुनी मोरगाव तालुक्‍यात मुसळधार पाऊस झाला.

दहा मध्यम प्रकल्पांची दरवाजे उघडली
अकोल्यातील वान या मोठ्या प्रकल्पांसह अमरावती जिल्ह्यातील चार, यवतमाळमधील दोन, बुलडाण्यातील तीन व अकोल्यातील एका मध्यम प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. ऑगस्टच्या अखेरच्या व सप्टेंबरमधील पहिल्या सप्ताहात पाणलोट क्षेत्रात बरसलेल्या दमदार धारांनी धरणांतील जलसाठा वाढविला आहे. अमरावती विभागात नऊ मोठे प्रकल्प असून अकोल्यातील वान प्रकल्पांत 86 टक्‍क्‍यांवर जलसाठा पोहोचल्याने खबरदारी म्हणून चार दरवाजे 45 सेंटिमीटरने उघडण्यात आले. त्यातून 139.87 घटमीटर प्रतिसेकंद गतीने विसर्ग सुरू आहे. मध्यम प्रकल्पांच्या श्रेणीतील अमरावती जिल्ह्यातील शहानूर, चंद्रभागा, सपन व पूर्णा या चारही धरणांची प्रत्येकी दोन दरवाजे 5 ते 10 सेंटिमीटरने उघडण्यात आली. मोठ्या प्रकल्पांच्या श्रेणीतील अमरावतीमधील अप्पर वर्धातील साठा दिवसेंदिवस वाढत आहे. सद्य:स्थितीत त्यामध्ये 93 टक्के साठा झाला असून शंभर टक्के साठा झाल्यानंतरच दरवाजे उघडण्यात येतील, असे कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे यांनी सांगितले. 236 घनमीटर प्रतिसेकंद असा पाण्याचा येवा असून धरण येत्या काही तासांत भरेल व दरवाजे उघडण्याची वेळ येऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बेंबळा व पेनटाकळी प्रकल्पात अनुक्रमे 86 व 88 टक्के साठा झाला आहे. तर, काटेपूर्णा (10 टक्के) व अरुणावतीची (12 टक्के) स्थिती अजूनही गंभीरच आहे. पूस प्रकल्पांत 41 टक्के साठा झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com