सत्तेसाठी रंगणार ‘हाय व्होल्टेज ड्रामा’

zp1.jpg
zp1.jpg

अकोला : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता सर्वच पक्षांकडून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मतदारराजाने कोणत्याही एका पक्षाला कौल न दिल्याने बहुमताचा आंकडा गाठण्यासाठी सर्वच पक्षांचे राजकीय नेते प्रयत्न करत आहेत. सर्वाधिक 23 जागा मिळून देखील वंचितला चार सदस्यांच्या समर्थनाची आवश्‍यकता असल्याने जिल्हा परिषदेत येणाऱ्या काही दिवसांमध्ये सत्तेसाठी ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ पाहायला मिळू शकतो, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

जिल्हा परिषदेच्या 53 गटांसह सात पंचायत समितींच्या 106 गणांसाठी मंगळवारी (ता. 7) निवडणूक पार पडल्यानंतर बुधवारी (ता. 8) मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात आले. निवडणुकीत मतदारराजाने कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही. वंचित बहुजन आघाडी (भारिप-बमसं) निवडणुकीत सर्वाधिक 23 जागा मिळवून मोठा पक्ष म्हणून पुन्हा एकदा समोर आला आहे.

वंचितला सत्ता स्थापनेसाठी चार सदस्यांच्या समर्थनाची आवश्‍यकता आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तीन अपक्षांनी सुद्धा बाजी मारली आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी अपक्षांची भूमिका सुद्धा महत्वाची ठरणार आहे. अपक्ष म्हणून निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार वंचित सोबत आल्यानंतर सुद्धा वंचितला एका सदस्याच्या समर्थनाची आवश्‍यकता पडणार आहे. त्यामुळे सदस्यांची जुळवा-जुळव करण्याकरिता वंचितला वेगळी रणनिती आखावी लागणार आहे. सत्तेसाठी वंचितला फोडा-फोडीचे राजकारण सुद्धा करावे लागणार असल्याने येणाऱ्या काही दिवसांत जिल्ह्यात सत्तेसाठी रस्सीखेच पाहायला मिळेल.

भाजपची भूमिका ठरणार निर्णायक
जिल्हा परिषद-पंचायत समितींच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आघाडी केली, तर मूर्तिजापूर तालुक्यात या आघाडीत शिवसेना पक्ष सहभागी झाला होता. निकालानंतर शिवसेनेचे 13, काँग्रेसचे 4 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 सदस्य निवडून आले आहेत. राज्यातील महाविकास आघाडीत सहभागी या पक्षांच्या सदस्यांची बेरीज 20 होते. त्यामुळे त्यांना सुद्धा सत्ता स्थापनेसाठी भाजपवर अवलंबून रहावे लागणार आहे.

निवडणुकीत भाजपचे 7 सदस्य विजयी झाले आहेत. सत्तेसाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांची महाआघाडी झाल्यास त्यांची सदस्य संख्या 27 होते. या नव्या समीकरणावर सुद्धा जिल्हा परिषदेत सत्तांतर होण्याची शक्यता आहे.

2016 मध्ये फसला होता प्रयोग
‘वंचित’ला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना (13 जागा), भाजप (7 जागा), काँग्रेस (4 जागा), राष्ट्रवादी काँग्रेसची (3 जागा) मोट बांधावी लागणार आहे. राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेने भाजपला लांब ठेवत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतले. त्यामुळे भाजप दुखावल्या गेला आहे. परंतु जिल्हा परिषदेत सत्तेसाठी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसला भाजप मदत करते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. असाच प्रयोग सन् 2016 मध्ये झाला होता. त्यावेळी शिवसेनेच्या दोन सदस्यांमुळे हा प्रयोग फसला होता, हे सुद्धा उल्लेखनीय आहे.

असे आहे पक्षीय बलाबल
पक्ष                     निवडून आलेले सदस्य
वंचित                  23 (एका पुरस्कृतसह)
भाजप                  07
शिवसेना              13
कॉंग्रेस                 04
राकॉंपा                03
अपक्ष                  03
एकूण                  53
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com