परतीच्या पावसामुळे सर्वाधिक नुकसान कापसाचे 

file photo
file photo

नागपूर : परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात 54 हजार 202 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, सर्वाधिक फटका कापसाला बसला. 34 हजार 962 हेक्‍टरमध्ये कापूस पिकाचे नुकसान झाले. त्यापाठोपाठ संत्र्याचे नुकसान झाले. जिल्ह्यात 1 लाख 19 हजार 355 शेतकरी बाधित झाले असून, महसूल विभागाने मदतीसाठी 46 कोटी 85 लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे. 


जिल्ह्यात खरिपाची पेरणी 4 लाख 79 हजार हेक्‍टरमध्ये झाली होती. त्यात सर्वाधिक क्षेत्र कापसाचे आहे. कापसाची एकूण 2 लाख 39 हजार हेक्‍टरवर पेरणी झाली. तर सोयाबीन 1 लाख हेक्‍टरवर व भाताची 94 हजार हेक्‍टरवर पेरणी झाली. गतवर्षी काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. यातून धडा घेत शेतकऱ्यांनी यंदा सावध भूमिका घेतली. मात्र, पावसाचा खंड पडल्याने पिकांना पाणी मिळाले नसल्याने पेरणी केलेल्या पिकांची वाढ खुंटली होती. तसेच धानाचे पऱ्हे तयार असतानाही पाऊस नसल्यामुळे ते करपण्याच्या स्थितीत होते. पेरणीनंतर पाऊस नसल्याने शेतकरी चिंतित होता. पावसाने जोर धरत सरासरी ओलांडली. चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. 


शेतकऱ्यांनी पेरणी केलेले पीक कापणीवर असताना अचानक झालेल्या परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लाख मोलाचे हजारो हेक्‍टरवरील पीक पाण्यात गेले. शेतकऱ्यांच्या पिकांनाही मॉन्सूनमधील पावसाने काही प्रमाणात फटका बसला होता. यातून सावरत कसेबसे सोयाबीन, कापूस, धान, संत्रा, मोसंबी, ज्वारी आदी पीक वाढले व मोठे झाले. 

नुकसानाच्या मदतीसाठी हवे 148 कोटी 
ऐन दिवाळीच्या काळात आलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले. पावसामुळे नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात 1 लाख 89 हजार 198 हेक्‍टरवर नुकसान झाल्याचे अंतिम पंचनाम्यातून स्पष्ट झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईसाठी 148 कोटी 29 लाख 17 हजार रुपयांचा प्रस्ताव महसूल विभागाकडून शासनाकडे पाठविण्यात आला. परतीच्या पावसाने पूर्व विदर्भाला चांगलेच झोडपून काढले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. त्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या सहा जिल्ह्यांत परतीच्या पावसाने तब्बल 3 लाख 81 हजार 4400 शेतकरी बाधित झाले असून, त्यांचे 1 लाख 89 हजार 198 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. यात कापूस, सोयाबीन, धान, ज्वारी, संत्रा, मोसंबी, मका आदी पिकांचा समावेश आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com