शेतात पाणी पोहचणार कसे?

शेतात पाणी पोहचणार कसे?

अकोला : रब्बी पिकांना पाणी सोडण्यासाठी अगोदरच विलंब झाला आहे. त्यातही कालव्यातील गाळ, झुडपे अजूनपर्यंत साफ करण्यात आली नसून कालव्यांची डागडुजी सुद्धा व्हायची आहे. त्यामुळे शेतात पाणी पोहचणार कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

गेल्यावर्षी दुष्काळ स्थितीमुळे सिंचन प्रकल्पांमधून पिकांसाठी आवश्यकतेनुसार पाणी मिळू शकले नाही. यंदा मात्र अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प फुल्ल असून, आतापर्यंत रब्बी तसेच खरिपातील बाकी असलेल्या पिकांसाठी त्यांचेमधून पाणी सोडण्यात यायला पाहिजे होते, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आता पाठबंधारे विभागाने जाहीर केलेल्या पाणी पुरवठा नियोजनानुसार 15 डिसेंबरपासून पहिल्या टप्प्यातील पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अजूनपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश कालव्यामध्ये मोठ्याप्रमाणात गाळ साचलेला असून, झुडपे दाटलेली आहेत. त्यांच्या साफसफाईचे काम महिनाभरापूर्वीच आटोपायला पाहिजे होते. परंतु अजूनही त्याकडे पाठबंधारे विभागाकडे दुर्लक्ष करण्यात येत असून, अनेक ठिकाणी डागडुजीची कामे ही व्हायचे आहेत. त्यामुळे शेतात पाणी पोहचणार कसे, असा प्रश्न शेतकरी तसेच पाणी वापर संस्थांद्वारे केला जात आहे.

10 डिसेंबरला पाणी सोडण्याचे आश्वासन
काटेपूर्णा, निर्गुणा प्रकल्पांवरील वितरीका, लघुवितरीकांवर अद्यापही चांगले काम झाले नसून, गाळ, झुडपे दाटली आहेत. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये ही सर्व कामे पूर्ण करून, 10 डिसेंबरला पाणी सोडू, असे आश्वासन जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. आता मात्र त्यांनी १५ डिसेंबरला पाणी सोडू, अशी नोटीस शेतऱ्यांना पाठविली आहे. त्यामुळे पाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात जलसंपदा विभाग किती गंभीर आहे हे लक्षात येत असून, सिंचन कायदा 2005 व 6 चा नियम जलसंपदा विभागाच धाब्यावर बसविणार की काय, अशी शंका, जिल्ह्यातील शेतकरी व प्रकल्प समिती अध्यक्ष मनोज तायडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली आहे.

हंगामी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा
ज्या प्रकल्पांवर सिंचन नाही अशा प्रकल्पांवरील कर्मचारी हंगामापुरते नियुक्ती करून सिंचनव्यवस्‍थापनाचा कार्यक्रम चांगल्याप्रकारे पार पाडला जाऊ शकतो. त्यामुळे जलसंपदा विभागाने पाणी वापर संस्थांना बैठकीमध्ये दिलेल्या आश्वासनानुसार 10 डिसेंबरलाच शेतकऱ्यांना पाणी द्यावे.
- मनोज तायडे, प्रकल्प समिती अध्यक्ष, अकोला

10 डिसेंबरलाच पाणी द्या
खरीप तर उद्धवस्त झालाच, आता रब्बी तरी हाती लागला पाहिजे. पाणी मिळण्यासाठी आधीच महिनाभर उशिरा झाला आहे. त्यामुळे अधिक विलंब न करता, 10 डिसेंबरलाच सिंचन प्रकल्पांच्या वितरीका, लघू वितरीकांना पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी विश्वासराव खुळे, पुरुषोत्तम महल्ले, विश्वजीत देशमुख, गोपाल पाटील, सुरेश पाटील, रक्षण देशमुख, डिगांबर महल्ले, विनोद महल्ले व काटेपूर्णा पाणी वापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

कालवा दुरूस्तीची सर्व कामे युद्धपातळीवर
प्रत्येक प्रकल्पावरून सिंचन करण्यासाठी मनुष्यबळ व निधी अपुरा आहे. वरिष्ठ कार्यालयांना त्याबाबत मागणी करण्यात आली आहे. कालवा दुरूस्तीची सर्व कामे युद्धपातळीवर हाती घेऊन 14 डिसेंबरपूर्वी पूर्ण करून 15 डिसेंबरला पाणी सोडण्याचे नियोजन केलेले आहे. कालव्याची काटछेद दुरूस्ती, रेन कट फिलिंग, गाळ व गवत काढणे, गेट दुरूस्ती इत्यादी कामे येत्या दोन आठवड्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे.
- चिन्मय वाकोडे, कार्यकारी अभियंता, पाठबंधारे विभाग अकोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com