घुग्घुस (जि. चंद्रपूर) : आम्ही चुकीचे केले. ती चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्नही केला. मदतीसाठी कुणी धावून आले. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेत आहे. माफ करा, अशी चिठ्ठी लिहून पती-पत्नीने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना चंद्रपूर तालुक्यातील म्हातारदेवी या गावात आज (ता. 27) घडली. विशेष म्हणजे पती-पत्नी दोघांनीही वेगवेगळ्या खोलीत फाशी लावली. त्यामुळे ही आत्महत्या की घातपात या दिशेने पोलिस तपास करीत आहेत.
म्हातारदेवी येथील वॉर्ड क्रमांक सहामधील साहनी कॉम्प्लेक्स येथे देवाशिष रॉय (वय 40) आणि त्यांची पत्नी शशिकिरण टोपे (वय 32) दोघेही भाड्याने राहत होते. या दोघांनीच गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. देवाशिष मूळचा कोलकता आणि शशिकिरण छत्तीसगडची आहे.
दोघेही घुग्घुस येथील एका शेअर मार्केटिंग कंपनीत काम करीत होते. आज बुधवारी दीड वाजताच्या सुमारास प्रवीण कोंकटी यांनी देबाशिषच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला. मात्र त्याला समोरून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याच्या पत्नीच्या भ्रणध्वनीवर प्रवीणने संपर्क केला.
दोघांकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी तो त्यांच्या घरी गेला. दाराची बेल वाजविली. दरवाजा ठोकला. आवाज दिला. मात्र, आतून कुठलाच प्रतिसाद येत नव्हता. शेवटी त्यांनी घुग्घुस पोलिसांना सूचना दिली. पोलिस पोहचले. त्यांनी दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला. तेव्हा त्यांना धक्कादायक दृश्य दिसले.
देबाशिष आणि शशिकिरणने वेगवेगळ्या खोल्यांमध्ये स्वतः:ला गळफास लावून जीवन संपविले होते. त्यांच्या शेजारीच लिखित माफीनामाही मिळाला. यात त्यांनी चूक झाल्याचे कबूल केले आहे.
ती चूक नेमकी कोणती होती, याचा तपास आता पोलिसांनी सुरू केला. ही आत्महत्या आहे की हत्या या दिशेनेही पोलिस तपासाची चक्र फिरवत आहेत. त्यांचा सीडीआर पोलिसांनी तपासणीसाठी पाठविला आहे. दरम्यान, या दोघांचेही नातेवाईक बाहेर राज्यात आहे. सध्या दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागले. त्यामुळे शवविच्छेदनानंतर या दोघांचेही मृतदेह शवागारगृहात ठेवले आहेत.
चंद्रपूर शहरातील व्यापारी नितीश गुनशेट्टीवार दोन दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झाले होते. त्याची तक्रार नातेवाइकांनी केली होत. पोलिस तपासात त्यांचा मृतदेह हाती लागला. त्यांची दुचाकी मार्डा गावाजवळ एका झाडाखाली आढळून आली. मात्र, ते तिथे नव्हते. दरम्यान शहरालगतच्या परिसरात एका झाडाला मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिस आत्महत्येच्या कारणांचा शोध घेत आहेत. परिस्थितीजन्य स्थिती वेगळाच प्रकार असल्याचे संकेत देत आहे, असे सूत्रांनी सांगितले. टाळेबंदीमुळे ते आर्थिक तणावात होते, अशी चर्चा आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.