मुंबईवरून कोरोनाची आयात; मित्रांना पार्टी पडली महागात 

दिग्रस (जि. यवतमाळ) : रुई गावाकडे जाणाऱ्या नागरिकांची तपासणी करताना पोलिस व आरोग्य कर्मचारी.
दिग्रस (जि. यवतमाळ) : रुई गावाकडे जाणाऱ्या नागरिकांची तपासणी करताना पोलिस व आरोग्य कर्मचारी.

दिग्रस, (यवतमाळ) : तीन महिन्यांच्या चिमुकलीला कोरोनाचा संसर्ग झाला. मात्र, तिच्या आईवडिलांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत. पॉझिटिव्ह असलेल्या महिलेच्या संपर्कात आल्यामुळे तिला कोरोनाचा संसर्ग झाला. तर, मुंबईवरून आलेल्या मित्राकडून पार्टी घेणे त्यांच्या मित्रांना चांगलेच महागाव पडले. त्या एका कोरोनाग्रस्तामुळे आता दोन मित्रांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मुंबई व पुण्यावरून अनेक जण आता गावी परतले आहे. त्यात मुंबईवरून यवतमाळ जिल्ह्यात आलेल्या नागरिकांच्या माध्यमातून कोरोनाचा शिरकाव झाला आहे. 

पुसद तालुक्‍यातील हुडी व निंबी, दिग्रस तालुक्‍यातील इसापूर, रोही व मरसूळ (तांडा) आणि उमरखेड तालुक्‍यातील नागापूर आदी गावांमध्ये मुंबईवरून परतलेल्या नागरिकांमुळे कोरोनाचा संसर्ग इतर नागरिकांना झाला आहे. त्यामुळे मुंबई व पुण्यावरून परत आलेल्या नागरिकांबाबत लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. 

मुंबईवरून आले एकाच मेटॅडोअरमध्ये

 मुंबईत रोजमजुरी करणारे इसापूर व रुई (तलाव) येथील नागरिक 14 मे रोजी आपल्या गावी परतले. ते पुसद तालुक्‍यातील हुडी येथील कोरोना पॉजिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले होते. ते मुंबईवरून एकाच मेटॅडोअरमधून आले होते. त्यामुळे इसापूर व रुई (तलाव) येथील चार नागरिकांनाही दिग्रस येथील कोविड सेंटरच्या विलगिकरण कक्षात भरती करण्यात आले होते. त्यांच्यावर प्रशासनाची नजर होती. त्यांचे 20 मे रोजी रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे त्या चौघांच्या संपर्कात आलेल्या 30 नागरिकांना क्वारंटाइन करून कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी गुरुवारी (ता. 28) आठ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी सहा व्यक्ती एकाच कुटुंबातील आहेत. त्यात तीन महिन्यांच्या चिमुकलीचाही समावेश आहे. विशेष म्हणजे ती कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने तिला संसर्ग झाला आहे. 

आई-वडिलांचा रिपोर्ट निगेटिव्ह 


मात्र, तिच्या आई-वडिलांचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे. तसेच मरसूळ (तांडा) व रुई (तलाव) प्रत्येकी एक-एक व्यक्ती सहभागी आहे. या दोघांनीही मुंबईवरून परतलेल्या आपल्या मित्रांसोबत पार्टी केली होती. त्यांनाही आता कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मुंबई व पुण्यावरून आलेल्या नागरिकांना प्रशासनाने होमक्वारंटाइन केले आहे. काहींना संस्थागत विलगिकरणातही ठेवण्यात आले आहे. मात्र, होम क्वारंटाइन केलेले नागरिक कोणतीही काळजी घेताना दिसत नाही. तोंडाला मास्क न लावताच ते गावात फिरताना दिसतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. अशा नागरिकांना प्रशासनाने आळा घालावा, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. 


बाहेर राज्यातून व बाहेर जिल्ह्यातून विशेषत: रेडझोनमधून आलेल्या नागरिकांमध्ये कोविड-19ची लक्षणे दिसून येत आहेत. आताच्या 25 ऍक्‍टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 23 रुग्ण बाहेर जिल्ह्यातून आलेले आहेत. बाहेर गावावरून आलेल्या नागरिकांनी स्वत: क्वारंटाइन राहून प्रशासनाला सहकार्य करावे. मास्कचा वापर करावा. ज्येष्ठांनी घरीच राहावे. बाहेर फिरू नये. 
-ललीतकुमार वऱ्हाडे,निवासी उपजिल्हाधिकारी, यवतमाळ. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com