अकोला - वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने 4 जुलै रोजी "नागपूर बंद'ची हाक दिली आहे. पावसाळी अधिवेश नागपुरात घेऊन वेगळा विदर्भ राज्य मागणी आंदोलनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने, त्याचा निषेध म्हणून नागपुरातील सर्व बाजारपेठा बंद पाडू, असा इशारा माजी आमदार वामनराव चटप यांनी मंगळवारी अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
'पावसाळी अधिवेश नागपुरात घेण्यामागे जी कारणे दिली जात आहे, ती दिशाभूल करणारी आहे. एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न या निमित्ताने सत्ताधारी भाजपकडून होत आहे. एकतर वेगळ्या विदर्भ राज्य मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनातील हवा काढून घेणे आणि दुसरीकडे सत्तेत सोबत राहून विरोधकाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेला एकटे पाडण्याचा प्रयत्न करणे. नागपुरात अधिवेशन काळात येणाऱ्यांची स्वतंत्र व्यवस्था करावी लागते. आमदाराशिवाय त्यांच्यासोबत येणाऱ्यांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देता येत नाही. असे असताना महाराष्ट्राचे अधिवेशन नागपुरात घेण्याचा प्रयत्न हाणून पाडू,'' असे चटप यांनी सांगितले.
|