अकोला - शेतकऱ्यांनो, माकडापासून सावधान ! माकडाच्या हल्ल्यात तुम्ही जखमी किंवा जिवाची हानी झाली, तरी नुकसानभरपाई मिळणार नाही. कारण वनविभागाच्या नियमानुसार, हिंसक पशूंनी हल्ला केला, तरच आर्थिक नुकसानभरपाई मिळू शकते आणि वनविभागाच्या लेखी माकड हे हिंसक पशू नाही.
जिल्ह्यातील शेत शिवारात हरीण, काळवीट, नीलगाय व सर्वाधिक माकडांचा हदौस आढळतो. अभयारण्ये, वनक्षेत्रात वाघ, बिबटे, अस्वल, गवा, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, रानकुत्रे इत्यादी हिंसक व मांसभक्षी वन्यप्राण्यांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे शाकाहारी वन्यप्राण्यांची संख्या कित्येक पटीने वाढली आहे. वनक्षेत्रातून या प्राण्यांचा शेत शिवार व लोकवस्तीमध्ये प्रवेश वाढला आहे. त्याचा परिणाम म्हणून, माणसांवर माकडांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहेत. काही घटनांमध्ये जीविताचीसुद्धा हानी झाल्याचे निदर्शनात आले. मात्र, वनविभागाच्या नियमावलीत माकडाच्या हल्ल्यातील नुकसानाची भरपाई देण्याची तरतूद नाही.
हिंसक वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्याबाबत नुकसानभरपाई देण्याचे निर्देश शासन निर्णयात दिले आहेत. तसेच रानडुक्कर, हरीण (सारंग व कुरंग), रानगवा, माकड, हत्ती आदी प्राण्यांमुळे झालेल्या पीकनुकसानाची भरपाईसुद्धा दिली जाते. मात्र, माकडाने मनुष्यावर केलेल्या हल्ल्याबाबत नुकसान भरपाई देण्याबाबत कोणतेच निर्देश नाहीत. शेतकऱ्यांनी आवश्यक माहिती व नुकसानभरपाईसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
- आर. एस. कातखेडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, अकोला
|