राळेगाव (जि. यवतमाळ) : शासनदप्तरी बेंबळा धरण (Bembala Dam) पूर्ण झाले. धरणाच्या टेलपर्यंत पाणीही पोहोचले. कागदोपत्री कालव्याची कामे पूर्ण झाली. तरी कालव्याशी संबंधित अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागते. कालवे झाले; पण अपेक्षित सिंचन होत (The expected irrigation is not taking place) नसल्याने बेंबळा धरण तालुकावासीयांसाठी पांढरा हत्ती ठरले. धरण झाले तेव्हा नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून येईल, शेतकऱ्यांचे जीवन सुजलाम् सुफलाम् होईल, असे चित्र रंगविण्यात आले. परंतु, ते चित्र कॅनव्हासवरच राहिले. (Irrigation-of-land-in-Ralegaon-taluka-was-only-on-paper)
बेंबळा धरण बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा नदीवर बांधण्यात आले; पण सर्वांत लांब कालवा राळेगाव तालुक्यातून जात असल्याने सर्वाधिक सिंचन राळेगाव तालुक्यातील तब्बल २३,९८७ हेक्टर जमिनीचे होणार होते. परंतु, येथे रब्बी हंगामात पाहिजे तसे ओलित होत नाही. २० हजार हेक्टर सिंचनाचा दावा संबंधित विभागाकडून केला जातो; परंतु सिंचनाच्या नावाने अजूनही बोंब आहे. कालव्याची बरीच कामे व्हायची आहेत. अनेक ठिकाणी कालव्याच्या खालचे व दोन्ही बाजूंचे सिमेंट काँक्रीटीकरण रखडलेले आहे. ही कामे किती दिवसांत पूर्ण होतील, त्याला किती वेळ लागेल, याचे उत्तर ना प्रशासनाकडे आहे ना लोकप्रतिनिधींकडे.
केळापूर तालुक्यातून सकाळीच निघून राळेगाव गाठले. बसस्टॉपवर ‘सकाळ’चे राळेगाव येथील तालुका बातमीदार राजेश काळे यांनी ‘रिसिव्ह’ केले. त्यांच्यासोबत वितरण प्रतिनिधी अजय राजकोल्हे होते. कोरोना योद्धे बाळू धुमाळ यांच्या साई दूध डेअरी ॲन्ड निड्समध्ये नाश्ता, चहा झाल्यानंतर बेंबळा प्रकल्पाच्या रखडलेल्या कामांबद्दल काळे सांगू लागले. २०१० ते २०१६ दरम्यान कालव्याची कामे झाली; परंतु अनेक ठिकाणी काम कच्चे आहे. पाटसऱ्यांचे तर सोडा अद्याप मुख्य कालवा, उपकालव्याचे काम झालेले नाही. कामे अपूर्ण असल्याने शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नाही. कालव्याला पाणी सोडले की ते वाया जाते. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे ऑडिट होणे अपेक्षित होते; मात्र ते होताना दिसत नसल्याची खंत काळे यांनी व्यक्त केली. तालुक्यातील ‘व्हायब्रंट’ मुद्दा असलेल्या सिंचन कालव्यांच्या कामाची पाहणी करण्याचे आम्ही ठरवले आणि निघालो.
अर्धवट, कच्च्या कालव्यांमुळे अनेकवेळा धरणाचे पाणी नाला किंवा नदीत वाहून जाते. त्यामुळे नदी-नाल्यात पाणी सोडण्यासाठी धरणाची निर्मिती केली का, असा प्रश्न काही शेतकऱ्यांनी उपस्थित केला. तर काही ठिकाणी अर्धवट कालव्यांमुळे पाणी थेट शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांत शिरून नुकसान होते तर दुसरीकडे अनेक शेतकरी आजही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. कालव्याचे सिमेंट-काँक्रीटीकरण झाले नसल्याने कालव्यात पाणी आले की ते लगतच्या शेतात पाझरते. त्यामुळे जमिनी क्षारपड होऊन निकस्स होतात. कॅनलमध्ये अनेक शेतकऱ्यांचे शेत गेले. काही शेतकरी भूमिहीन झाले. काहींच्या शेतात कॅनल असूनही, पाणी आलेच नाही. तर काहींच्या शेतात कॅनल तिथेच संपला. तो पुढे गेलाच नाही. धरण, कॅनलवर कोट्यवधींचा खर्च झाला; परंतु धरणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली नाही. ज्यामुळे त्यांचे जीवनमानही सुधारले नाही.
अमरावती जिल्ह्यासारखी सोय करा
पाटसऱ्यांची कामे अपूर्ण असल्याने शेतीचे सिंचन होऊच शकत नाही. अर्धवट कामांमुळे शेतकऱ्यांना माणूसभर कालव्यातून पाणी डिझेल इंजीनद्वारे शेतात न्यावे लागते. कालव्यापासून शेत दूर असल्यास पाइपलाइन टाकून पाणी न्यावे लागते. अनेक शेतकऱ्यांचे डिझेल इंजीन चोरीला गेले. शेतकऱ्यांकडे पाइपलाइनसाठी पैसे नसतात. त्यामुळेही अपेक्षित सिंचन होत नाही. अमरावती जिल्ह्यात धरणाचे पाणी पाइपलाइनद्वारे थेट शेतकऱ्यांच्या शेतात दिले जाते. तशा प्रकारची व्यवस्था सिंचन विभागातर्फे झाल्यास निश्चितच सिंचनाचे क्षेत्र वाढू शकते. आजतागायत केवळ रब्बी पिकांसाठीच सिंचन विभागातर्फे पाण्याचे नियोजन करण्यात येते. बारमाही सिंचनाचे नियोजन विभागाने करणे गरजेचे आहे. मार्च महिन्यात पाणी बंद होते. बारमाही सिंचनाचे नियोजन केल्यास शेतकरी शेतात फळबागा लावू शकतील.
जमिनी गेल्या; मोबदला मिळाला नाही
कालव्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. जमिनीचे दोन तुकडे झाले. परंतु शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही. त्यासाठी त्यांना न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. बेंबळा कालव्याने शेतीचे नुकसान झाल्यास शेतकरी बेंबळा तसेच महसूल विभागाकडे जातो. पण दोन्ही ठिकाणी केवळ टोलवाटोलवी होते. बेंबळा कालव्याशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची संबंधित विभागाकडून सुनावणी व्हायला हवी; परंतु ती होत नसल्याने वर्षानुवर्षांपासून प्रश्न, समस्या कायम आहेत.
(Irrigation-of-land-in-Ralegaon-taluka-was-only-on-paper)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.