अल्पवयीन गुन्हेगार पोलिसांची डोकेदुखी!

Crime
Crime

नागपूर - उपराजधानीतील गुन्हेगारी जरी नियंत्रित असली तरी अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचा बलात्कार, विनयभंग, चोरी, घरफोडी, लूटमार आणि शस्त्राचा वापर अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग दिसतो. अल्पवयीन मुलांना कायद्याचे संरक्षण असल्याने त्यांना अटक करता येत नाही. त्यामुळे अल्पवयीन गुन्हेगार सध्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

शहरातील झोपडपट्टी परिसरात बालगुन्हेगारांचे प्रमाण अधिक आहे. विभक्‍त कुटुंब आणि आई-वडिलांना असलेले दारू-अमली पदार्थांचे व्यसन यांचा परिणाम मुलांवर होतो. संस्कारांचा अभाव आणि वाईट संगतीमुळे अनेक मुले वाममार्गाला लागत आहेत. काही केवळ शौक म्हणून चोरी, घरफोडी तसेच दुचाकी चोरण्यासारखे गुन्हे करीत असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले. व्यसनाची पूर्तता करण्यासाठी किंवा मोबाईल, कपडे, घड्याळ, बाइक किंवा अन्य चैनीच्या वस्तू मिळविण्यासाठी मुले चोरी करण्यास धजावतात. गुन्ह्याच्या चौकशीदरम्यान अशा मुलांना ताब्यात घेतल्यानंतर पालकांना बोलावून घ्यावे लागते. अशा मुलांना बाल न्यायमंडळासमोर हजर केले जाते. १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांचा विधिसंघर्षग्रस्त बालक असा उल्लेख केला जातो. त्यांना कायद्याने मोठे संरक्षण दिले आहे.

‘केअर’चे महत्त्व
पोलिस आयुक्‍त डॉ. उपाध्याय यांनी राज्यातील पहिले ‘केअर’ नावाने विधिसंघर्षग्रस्त बालकांसाठी केंद्र तयार केले. प्रत्येक पोलिस ठाण्यात बाल पोलिस अधिकारी नियुक्‍त केला. नकळत हातून गुन्हा घडलेल्या मुलांवर संस्कार, खेळ, शिक्षण, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम डॉ. उपाध्याय ‘केअर’च्या माध्यमातून करीत आहेत.

बहुतांश मुले व्यसनाच्या आहारी गेली आहेत. त्यातूनच ते गुन्हेगारीकडे वळतात. त्यांना वेळीच समुपदेशन, मार्गदर्शन आणि प्रतिबंध न झाल्यास भविष्यात गुन्हेगारी जगतात मोठे नाव होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे पोलिस आणि अन्य विभागांच्या मदतीने प्रयत्न केले जातात. शिक्षण, प्रशिक्षण, खेळ आणि मायेची ऊब देण्याचे काम पोलिस करीत असतात. पालकांनीही आपली जबाबदारी ओळखायला हवी.
- संभाजी कदम, पोलिस उपायुक्‍त, गुन्हे शाखा

बालनिरीक्षणगृह योजना
१८ वर्षे कमी वयाचा मुलगा गुन्ह्यात सहभागी आढळल्यास त्याला अटक करता येत नाही. त्याला काही दिवस बाल निरीक्षणगृहात ठेवले जाते. पालकांच्या संमतीने किंवा चांगल्या वागणुकीच्या हमीवर त्याला सोडून दिले जाते. मात्र, ‘कुछ नहीं होता’ अशी भावना मनात रुजल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होते. पुढे गंभीर गुन्हे करण्यास चालना मिळते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com