देववाणी "संस्कृत'कडे विद्यार्थ्यांचा कल 

देववाणी "संस्कृत'कडे विद्यार्थ्यांचा कल 

रामटेक (जि. नागपूर) - महाकवी कालिदासांची कर्मभूमी असलेल्या रामटेकच्या कविकुलगुरू संस्कृत विश्‍वविद्यालयामध्ये कालिदासांच्या साहित्य अभ्यासासह संस्कृत भाषेतील प्राचीन व आधुनिक युगातील शास्त्रांशी ज्ञानाचा मेळ घालून आंतरविद्याशाखीय संशोधनाचे कार्य करण्यात येणार आहे. देववाणी असलेल्या संस्कृत भाषेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. आधुनिक विज्ञानासह योग, ज्योतिष, वास्तू व आतिथ्य (हॉस्पिटॅलिटी) हे अभ्यासक्रमही राबविण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा संस्कृत विद्यापीठातून पदवी मिळविण्याकडे कल वाढू लागला आहे. 

भारतीय साहित्यातील श्रेष्ठ रचनाकार म्हणून ख्यात असलेले कवी कालिदास यांनी रामटेकच्या रामगिरी टेकड्यांवर "मेघदूत' या संस्कृत खंडकाव्याची रचना केली, असे सांगण्यात येते. संस्कृतचा प्रचार-प्रसार देश-विदेशात व्हावा व संस्कृत साहित्याचा अभ्यास व्हावा, यासाठी रामटेकमध्ये कविकुलगरू कालिदास संस्कृत विश्‍वविद्यालयाची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रात स्वतंत्र संस्कृत विद्यापीठ असावे, असे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे स्वप्न होते. 18 सप्टेंबर 1997 रोजी रामटेकमध्ये संस्कृत विद्यापीठाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. संस्थापक कुलगुरू म्हणून डॉ. पंकज चांदे यांनी विद्यापीठाला नावलौकिक मिळवून दिला. त्यानंतर डॉ. उमा वैद्य यांनी व आता प्रा. श्रीनिवास वरखेडी हे कुलगुरू आहेत. 

रामटेक येथे होणाऱ्या कालिदास महोत्सवात विद्यापीठाने "मेघदूत' या खंडकाव्यावर आधारित नृत्यनाटिका सादर करून संस्कृत विषय लोकाभिमुख करण्यास सुरवात केली. या वर्षीच्या कालिदास महोत्सवात "अभिज्ञान शाकुंतलम' या संस्कृतमध्ये सादर झालेल्या नृत्यनाटिकेचा उल्लेख करावा लागेल. विद्यापीठांतर्गत 36 महाविद्यालये संलग्न आहेत. 2018-2019 पासून प्राकशास्त्री, शास्त्री, आचार्य इ. अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. तर, वारंगा येथे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय ज्ञान केंद्राला मान्यता मिळाली आहे. त्याद्वारे संस्कृत भाषेतील प्राचीन, आधुनिक युगातील शास्त्राशी ज्ञानाचा मेळ घालून आंतरविद्याशाखीय संशोधनाचे कार्य करण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासनात अधिकारी पदावर कार्य करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता 'बी.ए. सिव्हिल सर्व्हिसेस' हा नवीन अभ्यासक्रम संस्कृत विश्‍वविद्यालयात उपलब्ध आहे. संस्कृत अध्ययन-अध्यापन-संशोधनाचे निरंतर कार्य विश्‍वविद्यालयात सुरू आहे. 

गुरुकुल प्रकल्प 
गुरू-शिष्य परंपरेतील कर्तव्याची जाणीव ठेवून विश्‍वविद्यालयाने भावी पिढ्यांच्या ज्ञानपोषणाची जबाबदारी ओळखून गुरुकुल प्रकल्पाची उभारणी केली आहे. श्रवण, मनन, निदिध्यासन याद्वारे शिष्याने ज्ञान प्राप्त करायचे. परंतु त्याचे उपयोजन व उपयोग कुटुंब, समाज, देश, राष्ट्र यांच्यासाठी करावा. पारंपरिक शास्त्राध्ययनाबरोबरच आत्मसंयमन, सामाजिक भानाची जाणीव करून देणे हे उद्देश यामागे आहे. या गुरुकुलात प्राकशास्त्री (अकरावी, बारावी), शास्त्री (पदवी), सन्मानित शास्त्री (पदविका), आचार्य (एम.ए.), विशिष्टाचार्य (एम.फिल.) व विद्यावारिधी (पीएच.डी.) पर्यंत दर्शन, व्याकरण, साहित्य, ज्योतिष, योग या शास्त्रांमध्ये शिक्षण देण्यात येणार आहे. राज्य सरकारने विद्यापीठाला "ज्ञान स्रोत केंद्र' म्हणून मान्यता दिली आहे. आगामी काळात विविध शाखीय संदर्भांचे, ज्ञानस्रोतांचे प्रामाणिक व विश्‍वासार्ह केंद्र म्हणून कविकुलगुरू कालिदास विश्‍वविद्यालय मार्गदर्शक ठरेल हे निश्‍चित.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com