नागपूर - जनधन योजनेतून जमा झालेले पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरव मोदीच्या हाती देऊन देशातून पळून जाण्यास मदत केली. दुसरीकडे उच्चशिक्षित युवकांना मोदी पकोडे विकायला लावत आहेत. देशात "भगोडा' आणि "पकोडा' या दोनच योजना फेमस आहेत, अशा शब्दांत युवा नेता कन्हैय्याकुमार याने आज केंद्र सरकारवर टीका केली.
बहुजन विचारमंचतर्फे आयोजित "संविधान जागर'मध्ये ते बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत यशवंत मनोहर अध्यक्षस्थानी होते. आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री नितीन राऊत आदी या वेळी उपस्थित होते.
कन्हैय्याने खास शैलीत थेट मोदी-शहांवर हल्ला चढविला. 'पैसे देऊन वोट खरेदी करतात, नंतर हजारो कोटी घेऊन नीरव मोदी पळून जातो. राजकारणाचा हा गेम सेट आहे. जनतासुद्धा मूकदर्शक बनून बघते आहे. उद्योगपतींसाठी सरकारने लाखो कोटींची मागणी आरबीआयकडे केली. यामुळेच आरबीआय प्रमुखांना राजीनामा द्यावा लागला,'' असे कन्हैय्याकुमार म्हणाला.
नोटबंदीतून तीन लाख कोटी रुपये पुढे आल्याचा दावा मोदी करतात, मग मेट्रोसह अन्य योजनांसाठी विदेशातून पैसा का आणावा लागतो, असा प्रश्नही त्याने उपस्थित केला.
|