खोकरलावासींचा पाण्यासाठी टाहो

ग्रामपंचायतीकडून प्रतिड्रम २० रुपये आकारणी, नागरिकांचा उपोषणाचा इशारा
water supply schemes
water supply schemesSakal

भंडारा - शहरालगत असलेल्या सर्वात मोठ्या असलेल्या खोकरला ग्रामपंचायतीत गेल्या एक वर्षापासून पाणीपुरवठा योजना बंद पडली आहे. जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर गेल्यामुळे विहिरीत, बोअरवेलला पाणी येत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी प्रतिड्रम २० रुपये आकारणी करण्यात येत आहे. यात पाण्यासाठी नागरिकांचा छळ करण्यात येत असल्याचा आरोप करून मोफत पाणीपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी नागरिकांनी १३ जूनपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे.

खोकरला ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजना सूरनदीतील स्रोतावर अवलंबून आहे. या योजनेसाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने दोन कोटी रुपये खर्च केले आहेत. नदीपात्रात गोसेखुर्द धरणाचे बॅकवॉटर साचल्यामुळे गेल्या एक वर्षांपासून पाणीपुरवठा योजना बंद पडली आहे. त्यापूर्वीही तीन वर्षांपासून अनियमितपणे गावात पाणीपुरवठा करण्यात येत होता. यावर्षीच्या कडक उन्हाळ्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. त्यामुळे खोकरला ग्रामपंचायतीच्या हद्दतील नवीन वसाहती आणि गावातील खासगी विहिरी, बोअरवेलमधून पिण्यासाछठी पाणी मिळेनासे झाले आहे. सार्वजनिक हातपंप व विहिरींची संख्याही पर्यादित आहे. त्यामुळे संपूर्ण खोकरला परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईची झळ बसली आहे.

आता ग्रामपंचायतीच्या वतीने नागरी वस्त्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी गरजूंकडून २० रुपये प्रतिड्रम आकारणी करण्यात येत आहे. त्यातही एकाच टँकरने पाणीपुरवठा होत असल्याने प्रत्येक वसाहत व वॉर्डात दररोज पाणीपुरवठा होत नाही. ग्रामपंचायतीने पाणीटंचाई अंतर्गत मंजूर करण्यात आलेली विंधनविहीर लोकवस्ती नसलेल्या भागात केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. नवीन वसाहतीत प्रत्येक घरी बोअरवेल आहेत. आता पाणी पातळी खोलवर गेल्याने पाणी मिळत नाही. त्यातही धरणातील पाणी दूषित असल्याने पिण्यासाठी दररोज कॅन खरेदी करण्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

या सर्व प्रकारात ग्रामपंचायतीकडून बेजबाबदारपणा होत असल्याचा आरोप करून गावातील वसाहती व वॉर्डामध्ये टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करण्यात यावा, पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती करून गावात पाणीपुरवठा सुरू करावा आणि टँकरची संख्या वाढविण्यात यावी या मागण्यांसाठी १३ जूनपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा करमचंद वैरागडे, भाऊराव बन्सोड, कार्तिक ईश्‍वरकर, गनिराम सेलोकर, गुलाब पारधी, वर्षा गजभिये, रिता गोंडाणे व नागरिकांनी दिला आहे.

नाव मोठे पण दर्शन खोटे

भंडारा शहरात पूर्वेला वैनगंगा नदी असल्यामुळे पश्‍चिमेला खोकरला हद्दीत गेल्या १५ वर्षांत अनेक नवीन वसाहती निर्माण झाल्या. स्वतंत्र ग्रामपंचचायत झाली. लोकसंख्या बरीच वाढली आहे. परंतु, त्यातुलनेत ग्रामपंचायतीकडून सोयीसुविधांच्या नावावर काहीही केले जात नाही. राजकीय नेते योजना व श्रेय्य लाटण्यातच मशगुल झाले आहेत. त्यामुळे सामान्य जनतेला अडचणींचा सामना सहन करावा लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com