Video : चक्क बाथरूममध्ये बिबट्याचा मुक्काम 

file photo
file photo

नवेगावबांध(गोंदिया) : अर्जुनी मोरगाव तालुक्‍यातील बाक्‍टी येथील श्रीराम गोविंदा शेंडे यांच्या घरी बाथरूममध्ये सकाळी साडेसहाच्या सुमारास एक बिबट्या शिरल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांत एकच खळबळ उडाली. मंगळवारी (ता. 7) हा थरार नागरिकांनी अनुभवला असून, वनविभागाने सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यंत रेस्क्‍यू ऑपरेशन करून बिबट्याला पिंजऱ्यात टाकले. तेव्हा कुठे बाक्‍टीवासींनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. 
गावासभोवताल ऊसाची शेती व जंगल लागून असल्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर होता. काही लोकांना रात्रीच्या वेळीही बिबट्या आढळला होता. 

मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास बिबट्या बाथरूममध्ये असल्याचे समजताच श्रीराम शेंडे यांनी आरडाओरड केली. गावातील लोक गोळा झाले. एकच खळबळ माजली. हळूहळू शेकडो लोक शेंडे यांच्या घराशेजारी जमले. दरम्यान, या घटनेची माहिती नवेगावबांध वनविभागाच्या चमूला देण्यात आली. या माहितीवरून वनक्षेत्राधिकारी रोशन दोनोडे, वनक्षेत्राधिकारी दर्शना पाटील यांच्या नेतृत्वात पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. खोडस्कर, सहायक वनक्षेत्राधिकारी एल. के. सरकार, सहायक वनपरिक्षेत्राधिकारी शेंडे, बहुरे, वनरक्षक मिथून चव्हाण, एफ. बी. पठाण, गोदे यांच्यासह कर्मचारी सकाळी 8 वाजता घटनास्थळी उपस्थित झाले.

दरम्यान, पाच तास चाललेल्या रेस्क्‍यू ऑपरेशननंतर बाथरूममध्ये आश्रय घेतलेल्या बिबट्याला अखेर दुपारी एक वाजता पिंजऱ्यात जेरबंद केले अन्‌ हे थरारनाट्या संपले. या बिबट्याला नंतर जंगलात सोडण्यात आले. 


वन्यप्राणी गावाकडे 

जंगलात वन्यप्राण्यांचा वावर मोठा आहे. राखीव जंगलामध्ये वन्यप्राण्यांची संख्या मोठी आहे. मात्र, त्या प्रमाणात त्यांच्याकरिता सुविधा नाही. सर्वात मोठी समस्या ही वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची आहे. पिण्यासाठी पाणी मिळाले नाही. तर प्राणी गावाकडे धाव घेतात. यामुळे दिवसेंदिवस वन्यप्राणी गावाकडे येत असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात वनविभागाने पुढाकार घेतल्यास ही समस्या सुटण्यास मोठी मदत होईल. मात्र, वनविभागाचे अधिकारी याकडे फारसे लक्ष देत नाहीत. 

सरंक्षण भिंतीची गरज 

गावाकडे वन्यप्राण्यांचा वावर मोठ्‌याप्रमाणात वाढला आहे. त्याचा सर्वाधिक फटका जंगलालगत राहणाऱ्या गावांना बसला आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी किंवा मृत्युमुखी पडणाऱ्या गुराखी आणि पाळीव प्राण्यांची संख्याही वाढत आहे. शासनाने प्रत्येक गावाच्या शेजारी संरक्षण भिंत उभी केल्यास हा प्रश्‍न काही प्रमाणात सुटू शकतो. परंतु, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही. याविरोधात यापूर्वी आंदोलनही करण्यात आले आहे. परंतु, लोकांच्या आंदोलनाकडे लोकप्रतिनिधी गांभीर्याने पाहत नाही, अस आजवरील अनुभवावरून दिसून येते. 


बाक्‍टी परिसराला लागून जंगल आहे. मानवाने जंगलातील वन्यजीवांचे खाद्य नष्ट केले. त्यामुळे वन्यजीव अन्नासाठी गावाकडे फिरकतात. हा बिबट पिल्लू एक-दीड वर्षांचा असावा. 
-रोशन दोनोडे, वनक्षेत्राधिकारी, नवेगावबांध. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com