खाल (चामडे) विक्री केंद्रे बंद : लाखोंच्या उलाढालीला लागला "ब्रेक' 

file photo
file photo

चंद्रपूर :  जिल्ह्यातून बकरा, बकरीचे चामडे उत्तर प्रदेशातील कानपूर, बंगलोर, मद्रास यासह अन्य शहरांतील चर्मोद्योग कारखान्यात जात होते. मात्र, गेल्या काही वर्षांत कातड्यांपासून तयार होणाऱ्या वस्तूंचे कारखाने सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बंद पडले. परिणामी, जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर निर्यात होणाऱ्या कातडीला "ब्रेक' लागला आहे. कातडे फेकण्याची वेळ या व्यावसायिकांवर आली आहे. 

अनेकांचा हिरावला रोजगार 

चंद्रपूर शहरात खाटीक समाजाची संख्या मोठी आहे. या समाजाचा प्रमुख व्यवसाय मांस विक्रीचा आहे. विशेषतः रविवार, शुक्रवारी आणि बुधवारी मोठ्या प्रमाणावर बकरे, बकऱ्या कापल्या जातात. बकऱ्याचे मांस विकल्यानंतर त्याचे चामडे शिल्लक असते. या चामड्यांना मोठी मागणी आहे. या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर चंद्रपूर शहरासह बल्लारपूर, राजुरा, कोरपना, गोंडपिंपरी, वरोरा, भद्रावती, ब्रह्मपुरी यासह अन्य तालुक्‍यांच्या ठिकाणी खाल (चामडे) विक्री केंद्रे सुरू झाले होते. या केंद्रात बुधवार, शुक्रवार आणि रविवारी मोठ्या मोठ्या खाटीक कातडे आणून विकत होते. प्रती चामडे 60 ते 70 रुपयांत विकल्या जात होते. महिन्याभरात लाखो रुपयांची उलाढाल चामडे विक्रीतून होत होती. खाटकांकडून आलेल्या चामड्यांना मीठ लावून वाळविल्यानंतर ते चर्मोद्योग कारखान्यात पाठविले जात होते. कातड्यांपासून बूट, बेल्ट, चप्पल यासह विविध वस्तू तयार केल्या जातात. याचे कारखाने उत्तर प्रदेशातील कानपूर, चेन्नई, बंगलोर, हैदराबाद यासह अन्य ठिकाणी आहे. 

खाल (चामडे) खरेदी केंद्रेही बंद 

चंद्रपूर जिल्ह्यातून जमा झालेले कातडे या ठिकाणी पाठविले जात होते. मात्र, नद्यांचे होत असलेले प्रदूषण, मागणीत घट यासह अन्य कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून कातड्यांपासून तयार होणाऱ्या वस्तूंचे कारखाने कुलूपबंद झाले. त्याचा परिणाम जिल्ह्यातील खाल (चामडे) खरेदी केंद्रेही बंद पडली आहे. चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागातही खाल (चामडे) खरेदी केंद्र होते. दर रविवारी येथून मोठ्या प्रमाणावर कातडे खरेदी होत होती. येथून खरेदी केलेले कातडे चेन्नई, हैदराबाद या ठिकाणी निर्यात केले जात होते. मात्र, तेथील कारखानेही आता बंद पडले. त्यामुळे आता शहरातून कातडे निर्यात बंद पडली आहे. एकेकाळी रविवारी गर्दीने फुलणारे हे केंद्र आता ओस पडले आहेत. चंद्रपूर शहरातील खाटीक व्यावसायिकांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, चाळीस ते पन्नास वर्षांपासून येथे खाल (कातडे) खरेदी केंद्र होते. येथील खाटीक व्यावसायिक येथे कातडे आणून विकायचे. त्याच्या मोबदल्यात थोडफार पैसे मिळायचे. मात्र, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे हे केंद्र बंद पडले आहे. कातड्याच्या मोबदल्या मिळणारे चार पैसेही मिळेनासे झाले आहे. आता कातडे बाहेर फेकण्याची वेळ आमच्यावर आली आहे. 


कातडे खरेदी केंद्र सुरू व्हावे 

बकऱ्यांच्या कामड्यातून मिळणारी रक्कम खाटिक समाजासाठी बोनस ठरत होती. मात्र, मागील काही वर्षांपासून कातड्यांना परप्रांतातून मागणी नसल्याने नाइलाजास्तव कातडे फेकून द्यावे लागत आहेत. शासनाने चामडे खरेदी केंद्र पुन्हा सुरू केल्यास खाटिक व्यावसायिकांना कातडे विक्रीतून नफा मिळू शकतो. त्यामुळे हे खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी खाटिक व्यावसायिकाकडून होत आहे. 


चंद्रपूर शहरात खाटीक समाजाची संख्या मोठी आहे. बकरे, बकरी मांस कापल्यानंतर उरलेले कातडे खरेदी केंद्रात विकत होते. त्याचा मोबदला कातडी बघून मिळत होता. मात्र, तीन- चार वर्षांपासून हे केंद्र बंद पडले आहे. आता कातडे फेकण्याची वेळ आमच्यावर आली आहे. 
-प्रकाश तुमाने, व्यावसायिक चंद्रपूर. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com