सेनेला कोंडीत पकडण्याचा डाव

file photo
file photo

यवतमाळ : विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने जिल्ह्यात कुठेही युतीधर्म पाळला नाही, असा थेट आरोप भाजपकडून केला जात आहे. त्यामुळे आता शिवसेनेला धक्का देण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर जिल्ह्यात यवतमाळ नगरपालिका व जिल्हा परिषदेत मोठे फेरबदल करण्याच्या तयारीसाठी भाजप कामाला लागली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात भाजपच पुन्हा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. सातपैकी पाच आमदार भाजपचे निवडून आलेले आहेत. गेल्या 2014मध्येही अशीच परिस्थिती होती. राज्यात दोन्ही पक्षांची युती असली तरी जिल्ह्यात मात्र दोन्ही पक्षांचे एकमेकांशी सूर जुळलेले नाहीत. जिल्हा परिषदेत अडीच वर्षांपूर्वी भाजपने कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसशी हातमिळवणी करीत शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवले होते. यवतमाळ नगरपालिकेतही भाजपकडे बहुमत आले परंतु, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला. त्यामुळे या ठिकाणीही शिवसेनेला खिंडीत गाठण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. 
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेचे सूर जुळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, झाले उलटेच. सूर जुळण्यापलीकडे दोन्ही पक्षांतील दुरावा वाढला आहे. जिल्ह्यात शिवसेनेने युतीधर्म पाळला नसल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनीच काही दिवसांपूर्वी केला. याशिवाय काही महिन्यांनंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व सभापतींच्या निवडणुकीत भाजपची भूमिका महत्त्वाची राहणार असल्याचेही सांगितले. तशीच परिस्थिती यवतमाळ नगरपालिकेतदेखील आहे. नगराध्यक्षांविरोधात भाजप, कॉंग्रेस व शिवसेनेतील एका गटाने उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. सर्वसाधारण सभेत भाजपसोबत कॉंग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसने सभात्याग केला होता. तेव्हापासून नगरपालिकेतील राजकारण बदलण्याची चर्चा सुरू झाली होती. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने नगरपालिकेतील राजकीय घडामोडी मंदावल्या होत्या. निकालानंतर आता पुन्हा राजकीय चर्चा सुरू झाली असून, सत्तास्थापनेचा मूहूर्त साधण्याची प्रतीक्षा भाजपला आहे. राज्यातील सरकार स्थापन झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. नगरपालिकेत नगराध्यक्षांविरोधात भाजप दंड थोपटण्याच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे येत्या जानेवारीत होऊ घातलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष व सभापतींच्या निवडीतही पुन्हा एकदा भाजप-राष्ट्रवादी तसेच कॉंग्रेस अशी युती होण्याची शक्‍यता वाढली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने विरोधी भूमिका घेतल्याने आता शिवसेनेशी घरोबा नाही, अशी भूमिकाच भाजप पदाधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्याचे मिनीमंत्रालय व यवतमाळ नगरपालिकेत मोठे फेरबदल होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

फेरबदलावर भाजप पदाधिकारी ठाम
शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत भाजपचे काम केले नाही, असा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांकडून सुरू झाला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी थंडावलेले भाजप-शिवसेनेतील राजकारण राज्यातील सत्तास्थापनेनंतर पुन्हा एकदा गरम होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी यवतमाळच्या एका भाजप पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला असून, चाचपणी सुरू केली आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com