एमबीएच्या अंतिम गुणवत्ता यादीत घोळ

file photo
file photo

नागपूर : राज्याच्या सीईटी सेलमार्फत राबविण्यात येणाऱ्या एमबीए प्रवेशाच्या अंतिम गुणवत्ता यादीत घोळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सीईटी सेलमार्फत विद्यार्थ्यांचे प्रवेशपूर्व परीक्षेचे गुण न घेताच अंतिम गुणवत्ता यादी तयार केल्याची माहिती आहे. त्यामुळे यादीतील 28 पैकी आठ विद्यार्थ्यांचे गुण चुकीचे आहेत. त्यामुळे गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी मागे पडल्याचे समजते.
एमबीए प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व परीक्षा उत्तीर्ण करणे गरजेचे असते. महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट (एमएचसीईटी), एम्स टेस्ट फॉर मॅनेजमेंट एडमिशन्स (एटमा), मॅनेजमेंट एप्टिट्यूड टेस्ट (मॅट), कॉमन मॅनेजमेंट एडमिशन टेस्ट (सी-मॅट)सारख्या कॉमन एंटरन्स टेस्टमधील गुणांच्या आधारावर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. नोंदणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सर्व कागदपत्रांची तपासणी केली जाते. नोंदणीनंतर गुणवत्ता यादी तयार करण्यात येते. प्रथम तात्पुरती तर त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात येते. मात्र, अंतिम गुणवत्ता यादीत काही विद्यार्थ्यांचे गुण वाढविण्यात आले. याच आधारावर त्यांचा महाविद्यालयात प्रवेश करण्यात आल्याचे समजते.
विशेष म्हणजे, द असोसिएशन ऑफ इंडियान मॅनेजमेंट स्कूल (एम्स)द्वारे घेण्यात आलेल्या गेल्या चार वर्षांच्या परीक्षेच्या निकालात कुणालाच 99.98 परसेंटाइलपेक्षा अधिक गुण मिळाले नव्हते. मात्र, सीईटी सेलमार्फत प्रकाशित केलेल्या एमबीएच्या ऑल इंडिया अंतिम गुणवत्ता यादीत टॉप 28 विद्यार्थ्यांपैकी आठ विद्यार्थ्यांचा "एटमा स्कोर' 99.99 परसेंटाइल दाखविण्यात आला. चार वर्षांत 99.99 परसेंटाइल गुण आजपर्यंत मिळाले नसताना, या विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत 99.99 परसेंटाइल मिळालेच कसे, हा प्रश्‍न समोर येत आहे. त्यामुळे गुणवत्ता यादीत घोळ असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com