वडाळीच्या तलाठी कार्यालयाला कुलूप

File photo
File photo

अमरावती : तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या वडाळी साझा क्रमांक पाचचे तलाठी कार्यालय मागील तीन-चार दिवसांपासून बंद असल्यामुळे नागरिकांना विविध दाखल्यांपासून वंचित राहावे लागत आहे. परिणामी दररोज ये-जा करावी लागत असल्याने मजुरीदेखील बुडत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सोमवारी (ता. 23) आठवड्याच्या कामकाजाचा पहिला दिवस असतानाही या कार्यालयाला कुलूप होते.

अमरावती तालुक्‍यातील वडाळी साझा क्रमांक पाचचे तलाठी कार्यालय भातकुली पंचायत समितीमधील एका खोलीत सुरू आहे. याठिकाणी विविध दाखले, शेतीचे व प्लॉटचे फेरफारची कामे केली जातात. त्यामुळे याठिकाणी दिवसभर गर्दी राहते. मात्र मागील तीन ते चार दिवसांपासून हे तलाठी कार्यालय बंद असल्याने येथील तलाठी व कर्मचारी गेले तरी कोठे? असा प्रश्‍न येथे येणाऱ्या नागरिकांना पडला आहे. तथापि, संगणकीकरणाचे काम सुरू असल्याने ऑफीस सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस सुरू राहील, असे पत्रक दारावर चिकटविलेले आहे. असे असताना सोमवारी (ता. 23) हे तलाठी कार्यालय दुपारी 12.30 वाजता कुलूपबंद होते. त्यामुळे याठिकाणी विविध दाखल्यांसाठी तसेच फेरफारच्या कामांकरिता आलेल्या नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान, येथे चौकशी केली असता आमचा वडाळी येथील तलाठी कार्यालयाशी काहीच संबंध नसल्याचे येथील एका अधिकाऱ्याने सांगितले. मग चौकशी तरी कोणाकडे करावी, हा प्रश्‍न उपस्थित होतो. शिवाय येथील तलाठ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद दाखविण्यात आला. त्यामुळे नागरिकांची प्रचंड निराशा झाली.

तलाठी सुटीवर
मागील तीन-चार दिवसांपासून प्रकृती बरोबर नसल्याने तलाठी श्री. चपटे हे सुटीवर आहेत. तथापि, त्यांचा प्रभार राजापेठ येथील तलाठी श्री. भगत यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी काही काम असल्यास त्यांच्याशी संपर्क साधावा, अशी माहिती अमरावतीचे तहसीलदार संतोष काकडे यांनी दिली.

कर्मचारी गेले कुठे?
तलाठ्यांची प्रकृती बरी नसल्याची माहिती आहे. असे असले तरी येथील कर्मचारी येणाऱ्या नागरिकांचे फॉर्म स्वीकारणे, त्यांना माहिती देणे आदी कामे करतात. मात्र हे कर्मचारीदेखील तीन-चार दिवसांपासून गायब असल्याने हे कार्यालय बंद तर झाले नाही ना? अशी शंका नागरिकांनी उपस्थित केली.

नागरिकांना हेलपाटे
भातकुली पंचायत समिती ते अमरावती तहसील कार्यालयाचे अंतर जवळपास पाच ते सहा किलोमीटर आहे. एवढ्या अंतरावर जाणे नागरिकांना परवडेनासे आहे. त्यामुळे तलाठी नसल्याने आल्या पावलीच घरी परत जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com