खिशात पाचशे रुपये ठेवून व्यवसाय कसा करायचा?

File photo
File photo

नागपूर : निवडणूक आयोगाने पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम बाळगल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. व्यापाऱ्यांनी पाचशे रुपये खिशात ठेवून व्यवसाय कसा करायचा, असा सवाल करून नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष कैलाश जोगानी यांनी केला आहे. तसेच निवडणूक आयोग अधिकाराचा दुरुपयोग करीत असल्याचेही ते म्हणाले.
निवडणूक आयोग तसेच निवडणुकीशी संबंधित अधिकारी थोडी रक्कम दिसली की थेट जप्तीची कारवाई करतात. रक्कम कोणाची, त्याचा निवडणुकीशी संबंध आहे की नाही याची कुठलीही खातरजमा करीत नाहीत. व्यापाऱ्यांना थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. प्रसिद्धिमाध्यमांना मोठे घबाड सापडल्याचे दर्शवून व्यापाऱ्यांची बदनामी करतात. बंधन आणायचेच असेल तर प्रथम मर्यादित रोख रक्कम ठेवण्याचा कायदा संमत करावा, नंतर कारवाईचा बडगा उगारा, असेही कैलाश जोगानी म्हणाले.
रोख रक्कम बाळगण्याच्या नियमानुसार व्यापारी आणि सामान्य नागरिकांना लक्ष्य केले जात असताना राजकीय नेत्यांकडे मात्र पाठ फिरवली जात आहे. व्यापाऱ्यांनीही रोजचे व्यवहार करताना कॅश बुक नियमित अपडेट ठेवावे. बॅंकेत पैसे भरण्यासाठी जात असल्यास तशी स्लिप भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नोटाबंदीच्या काळातही सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांनाच त्रास झाला. आताही त्यांनाच त्रास होऊ लागला आहे. कायद्याचे उल्लंघन निवडणूक आयोग करीत असल्याचा आरोपही कैलाश जोगानी यांनी केला. पत्रकार परिषदेला नागपूर चेंबरचे अध्यक्ष विष्णूकुमार पचेरीवाला, सचिव अनिल शर्मा, उपाध्यक्ष प्रदीप जाजू, गोविंद पसारी, सहसचिव तरुण निर्वाण, धवलसिंग मोहिते, वसंत पालिवाल उपस्थित होते.
देशात आणीबाणी लादण्याचे षडयंत्र
आचारसंहितेच्या नावाखाली काही वर्षांपासून सर्वसामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांवर नवनवीन बंधने आयोगामार्फत लादल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा येऊ लागली आहे. आता 50 हजारांपेक्षा अधिक रोख रक्कम बाळगणाऱ्या व्यापारी अथवा नागरिकांनाही लक्ष केले जात आहे. तहसीलदार, नायब तहसीलदारच नव्हे तर साधा सरपंचही नागरिकांची तपासणी करीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी अडचणीत आला आहे. किती रोख रक्कम बाळगता येते यासाठी देशात अद्याप कुठलाच कायदा अस्तित्वात नाही. असे असताना निवडणुकीच्या काळात असे बंधने घालून राजकीय नेत्यांना सोडून संन्यासाला त्रास का दिला जात आहे. या माध्यमातून देशात आणीबाणी लादण्याचे षडयंत्र आखले जात आहे, असाही आरोप त्यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com