"मेक इन महाराष्ट्रा'चा प्रयोग फसला

Sakal-Vishesh
Sakal-Vishesh

नागपूर - महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्यासाठी "मेक इन महाराष्ट्रा'चे झगमगीत सोहळे केले. मोठा गाजावाजा झाला. मात्र, त्यातून कोणतीही ठोस गुंतवणूक विदर्भात आली नसल्याची बाब उघडकीस आली आहे. "मेक इन महाराष्ट्र'मध्ये विदर्भातील 274 सामंजस्य करार झालेत. त्यातील 20 टक्केही उद्योग सुरू झालेले नसल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

मेक इन महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यासाठी 103 करार झाले. त्यात 3062 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित होती. त्यातील 36 उद्योग सुरू झाले असून, त्यात 207 कोटींची गुंतवणूक झालेली आहे. 103 कराराच्या माध्यमातून अकरा हजार युवकांना रोजगार मिळणार होता.

तीन वर्षांचा कालावधी लोटला असताना 36 उद्योग सुरू झाल्याने फक्त 1750 जणांनाच रोजगार मिळाला आहे. अकरा उद्योजक 1730 कोटींची गुंतवणूक करणार होते. त्यांच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. 37 उद्योजकांनी फक्त संरक्षण भिंत उभारून काम थांबविले आहे. 15 उद्योजकांचे प्रस्तावच थंडबस्त्यात आहेत. चार उद्योजकांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे उघड झाले आहे. तीन वर्षांनंतर आतापर्यंत फक्त 103 पैकी 36 उद्योगाला गती मिळाली असल्याची बाब पुढे आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील 48 पैकी फक्त दहाच उद्योजकांनी उद्योग सुरू करण्यासाठी स्वारस्य दाखविले आहे. मेक इन महाराष्ट्रामध्ये 48 प्रस्तावावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यातून 162 कोटी रुपयांची गुंतवणूक होणे अपेक्षित होते. त्यातील दहा उद्योजकांनी फक्त 20 कोटींची गुंतवणूक केलेली आहे. गडचिरोली जिल्ह्यात सहा सामंजस्य करार झाले त्यातील एकही उद्योग सुरू झालेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com