वत्सगुल्म नगरी : अभिजात मराठीची गंगोत्री!

कवी गुणाढ्य यांचे कल्पनाचित्र.
कवी गुणाढ्य यांचे कल्पनाचित्र.

वाशीम - प्राचीन वत्सगुल्म, अर्थात आताच्या वाशीम शहराचा इतिहास मराठी भाषेच्या प्राचीन इतिहासासोबत जोडला गेला आहे. वाशीम येथे कवी गुणाढ्य यांच्या बृहद्‌कथा या ग्रंथाने मराठीचे प्राचीनत्व सिद्ध केले असून, मराठीच्या अभिजात दर्जासाठी वाशीम शहराच्या इतिहासाचा संदर्भ मोठा ठरला.

ज्ञानोबारायांनी मायमराठीचा ज्ञानेश्‍वरीतून ‘अमृताचेही पैजा जिंके’ असा गौरव केला आहे. ही २००० वर्षांपूर्वी बोलली जाणारी प्राचीन भाषा सध्या अभिजात दर्जा मिळविण्यास कासावीस होत आहे. या अभिजात दर्जासाठी नेमलेल्या समितीने इ. स. पूर्व २५० ते इ. स. २५० या काळातील मराठीचा इतिहास शोधून काढला असून, या इतिहासामध्ये प्राचीन वत्सगुल्म, अर्थात आताचे वाशीम या शहराचा इतिहास मराठी भाषेच्या प्राचीन इतिहासासोबत जोडला गेला आहे. वाशीम येथे कवी गुणाढ्य यांच्या बृहद्‌कथा या ग्रंथाने मराठीचे प्राचीनत्व सिद्ध केले असून, मराठीच्या अभिजात दर्जासाठी वाशीम शहराच्या इतिहासाचा संदर्भ मोठा ठरला आहे. 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. केंद्र सरकारने तमीळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर ही मागणी जोर धरत होती. यासाठी मराठी अभिजात भाषा समितीची स्थापना केली होती. या समितीमध्ये भाषातज्ज्ञ रंगनाथ पठारे, प्रा. हरी नरके, श्रीकांत बहुलकर, नागनाथ कोत्तापल्ले, सतीश काळसेकर, कल्याण काळे, मधुकर वाकोडे, मैत्रेयी देशपांडे, आनंद उबाळे आदी तज्ज्ञांचा समावेश होता. या समितीने मराठी भाषेचे प्राचीनत्व शोधण्यास प्रारंभ केल्यावर मराठी भाषेचा उगम सातवाहनाच्या काळापर्यंत होता, असे पुरावे मिळाले. या पुराव्यामध्ये मुख्यत्वे महाराष्ट्रात इ. स. पूर्व २५० ते इ. स. २५० या कालावधीत राज्य करणाऱ्या सातवाहनाच्या कालखंडापर्यंत मराठी भाषेच्या अस्तित्वाचे पुरावे असल्याचे दिसून आले. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात सातवाहनाच्या राजदरबारात गुणाढ्य नावाचा प्रधान होता. त्याचा जन्म वाशीम म्हणजेच तत्कालीन वत्सगुल्म शहरात झाला होता, असे अनेक विद्वानांनी नोंदविले आहे. या गुणाढ्याने ‘बृहद्‌कथा’ नावाचा ग्रंथ लिहिला होता. तो सध्या उपलब्ध नसला, तरी त्यातील कथा भाग पंडित क्षेमेंद्राच्या ‘बृहद्‌कथा मंजिरी’ या ग्रंथात आला. त्यात कवी गुणाढ्याच्या वत्सगुल्म संदर्भाची उकल होते. सोमेश्‍वराच्या ‘कथासरितासागर’ नामक ग्रंथात तर गुणाढ्याच्या जन्माचे वर्णन विस्तृतपणे आले आहे. तसेच सह्याद्री पर्वताच्या रांगेत नाणेघाटामध्ये ब्राह्मी लिपीमधील २००० वर्षांपूर्वीचे शिलालेख आढळले. या शिलालेखामध्ये ‘मराठी महारथीनो’ असे शब्द आहेत. तमीळ भाषेतील संगम साहित्य या २५०० वर्षांपूर्वीच्या ग्रंथात मराठी गवंडी कावेरी घाटावर चांगले काम करतात, असा उल्लेख आहे. या सोबतच महाराष्ट्री प्राकृत आणि आजची मराठी यावर दाखले उपलब्ध आहेत.

महाकवी गुणाढ्य हा सातवहनाच्या दरबारी असला तरी नंतर तो काश्‍मीरच्या राजाच्या दरबारी राहिला. येथेच त्याने ‘बृहद्‌कथा’ नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये पैशाची भाषा आली आहे. त्यामुळे मराठी प्राचीन काळातसुद्धा अस्तित्वात होती, असे मत भाषा समितीचे सदस्य प्रा. हरी नरके यांनी व्यक्त केले. कवी गुणाढ्याच्या बृहद्‌कथा या ग्रंथाचे सोमदेवाने ११व्या शतकात भाषांतर केले होते. त्याचे ख. पु. भावे यांनी कथासरितासागर या नावाने पाच खंडांत मराठीत भाषांतर केले होते. दुर्गा भागवत यांनी या ग्रंथाला प्रस्तावना दिली होती. रामायण, महाभारत या महाकाव्यांनंतर ‘बृहद्‌कथा’ हे तिसरे प्रसिद्ध महाकाव्य आहे, हे या निमित्ताने स्पष्ट झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com