अकोला - अकोला शहराची जीवनवाहिनी प्रदूषणामुळे विषवाहिनी झाली आहे. या जीवनवाहिनीला स्वच्छ करण्याचा विडा अकोलेकरांनी उचलला आणि पाहतापाहता ही लोकचळवळ उभी झाली. मोर्णा नदी स्वच्छतेसाठी अकोलेकरांनी घेतलेल्या पुढाकाराची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेऊन, २०१८ या वर्षातील पहिल्याच ‘मन की बात’मध्ये त्यांनी या लोकचळवळीचे कौतुक केले. एकेकाळी ‘सकाळ’ने सुरु केलेली मोर्णा संवर्धनाची चळवळ जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने लोकचळवळ झाली आणि त्याची दखल देशपातळीवर घेतली गेली.
मोर्णा नदी जलकुंभीमुळे प्रदूषित झाली. तिला मोकळा श्वास घेता यावा म्हणून जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी पुढाकार घेत मोर्णा नदी स्वच्छतेला लोकचवळीचे स्वरूप दिले. यावर्षीच्या सुरुवातीलाच त्यांनी लोकसहभागातून ही नदी स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला आणि पाहतापाहता ‘मिशन मोर्णा’ला लोकचळवळीचे स्वरुप मिळाले. दर शनिवारी मोर्णा नदीच्या काठावर अकोलेकरांनी एकत्र येऊन विषवाहिनीला गतवैभव मिळून देण्यासाठी योगदान दिले. या चळवळीत १०० पेक्षा अधिक स्वयंसेवी संस्था आणि सहा हजारांपेक्षा अधिक लोकांनी सहभाग घेऊन नदी स्वच्छतेचा एक आर्दश देशापुढे ठेवला. त्याचा उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी रविवारी (ता. २८) देशातील नागरिकांपुढे ‘मन की बात’ बात ठेवताना केला. अकोलेकरांच्या या सकारात्मक कार्याचा हा गौरव असून, त्यातून मोर्णा नदी स्वच्छतेच्या अभियानाला आणखी बळ मिळणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.