`आणि शेवटी प्रार्थना` या नाटकात (डावीकडून) ऋतुराज वानखेडे, स्वाती कुलकर्णी व सौरभ बिरमवार.
`आणि शेवटी प्रार्थना` या नाटकात (डावीकडून) ऋतुराज वानखेडे, स्वाती कुलकर्णी व सौरभ बिरमवार.

नागपूरचे ‘आणि शेवटी प्रार्थना’ राज्यात प्रथम

नागपूर - राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत नागपूरच्या राष्ट्रभाषा परिवारचे  ‘आणि शेवटी प्रार्थना’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावून वैदर्भी रंगभूमीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. नांदेड येथे झालेल्या अंतिम फेरीत ‘आणि शेवटी प्रार्थना’ या नाटकाने निर्मितीसह तब्बल सहा पुरस्कारांवर मोहर उमटविली आहे. स्पर्धेच्या ५७ वर्षांच्या इतिहासात विदर्भाच्या नाटकाने पहिला क्रमांक पटकाविण्याची ही सातवी वेळ आहे, हे विशेष.

दोन वर्षे राज्य नाट्य स्पर्धेपासून लांब राहून एकांकिका आणि प्रायोगिक प्रयत्नांच्या माध्यमातून दिग्दर्शक रूपेश पवार याने नव्याकोऱ्या कलावंतांना तयार केले. यावर्षी पूर्ण तयारीनिशी हे  कलावंत राज्य नाट्य स्पर्धेच्या रंगमंचावर उतरले. दोन एकांकिकांचा मेळ घालून एका कथेत त्याची गुंफण करण्याचे कसब रूपेशने दाखविले. राष्ट्रभाषा परिवारला सर्वोत्कृष्ट निर्मितीसाठी ६ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. रूपेश पवार सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि आकाश मोरघडे सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार ठरले.

याशिवाय स्वाती कुलकर्णी आणि ऋतुराज वानखेडे यांना उत्कृष्ट अभिनायासाठी रौप्यपदक जाहीर झाले. अमरावती येथील रसिका वानखेडे-वडवेकर हिलादेखील महेंद्र सुके लिखित व विशाल तराळ दिग्दर्शित ‘कु. सौ. कांबळे’ या नाटकासाठी अभिनयाचे रौप्यपदक जाहीर झाले. प्रायोगिक रंगभूमीवरील सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फळ असल्याचे बोलले जात आहे.

अतिशय मोजक्‍या, पण प्रभावी नेपथ्याच्या जोरावर नाटकाचे सादरीकरण करण्याचे रूपेश पवार याचे प्रयोग स्पर्धेच्या व्यासपीठावर विशेष भाव खाऊन गेले. एकाचवेळी जास्तीत जास्त कलावंत रंगमंचावर असले तरी त्यांच्यातील कमालीचा समन्वय, हे आणखी एक वैशिष्ट्य. ‘आणि शेवटी प्रार्थना’ प्रकाशयोजनेसह या सर्व पातळ्यांवर योग्यता सिद्ध करणारे होते आणि अंतिम फेरीत प्रथम क्रमांक देऊन परीक्षकांनी पावतीही दिली. मधू जोशी, केशव देशपांडे, अनिल सोनार, दिलीप पाध्ये आणि प्राची गोडबोले यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. 

इतिहासात सातव्यांदा...
राज्य नाट्य स्पर्धा सुरू झाल्यानंतर पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या ‘चंद्र नभीचा ढळला’, ‘वऱ्हाडी माणसं’ आणि ‘नयन तुझे जादूगर’ या तीन नाटकांनी राज्य नाट्य स्पर्धेत राज्यातून पहिला क्रमांक पटकाविला होता. ‘नयन तुझे जादूगर’नंतर २८ वर्षांनी पराग घोंगे लिखित व प्रकाश लुंगे दिग्दर्शित ‘वाळूचं घर’ या नाटकाने ही किमया साधली. त्यानंतर काहीच वर्षांनी श्‍याम पेठकर लिखित व हरीश इथापे दिग्दर्शित ‘रगतपिती’ या नाटकाने राज्यात पहिला क्रमांक पटकावला होता. पुढे थेट १८ वर्षांनी २०१३ मध्ये अजय धवने दिग्दर्शित ‘चिंधी बाजार’ या नाटकाने हा गौरव पटकावला. त्यानंतर यंदा चारच वर्षांनी राष्ट्रभाषा परिवारने प्रथम पुरस्कार पटकावला. वैदर्भी संस्थेने राज्यात बाजी मारण्याची ही इतिहासातील सातवी वेळ आहे.

विदर्भाला मिळालेली पारितोषिके
निर्मिती प्रथम - ‘आणि शेवटी प्रार्थना’
दिग्दर्शन प्रथम - रूपेश पवार (आणि शेवटी प्रार्थना)
नेपथ्य द्वितीय - पुष्पक भट (आणि शेवटी प्रार्थना)
प्रकाशयोजना तृतीय - मंगेश विजयकर (आणि शेवटी प्रार्थना)
रंगभूषा प्रथम - आकाश मोरघडे (आणि शेवटी प्रार्थना)
संगीत द्वितीय - ऋतुराज वानखेडे (आणि शेवटी प्रार्थना)
अभिनय रौप्यपदक - स्वाती कुलकर्णी व ऋतुराज वानखेडे (आणि शेवटी प्रार्थना) आणि रसिका वानखेडे-वडवेकर (कु. सौ. कांबळे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com