संयमाची परीक्षा

नागपूर - बारावीच्या परीक्षेच्या पहिल्या दिवशी म्हणजे बुधवारी धनवटे नॅशनल कॉलेजसमोर सकाळी १०.३० च्या दरम्यान वाहतुकीची झालेली कोंडी.
नागपूर - बारावीच्या परीक्षेच्या पहिल्या दिवशी म्हणजे बुधवारी धनवटे नॅशनल कॉलेजसमोर सकाळी १०.३० च्या दरम्यान वाहतुकीची झालेली कोंडी.

नागपूर - राज्यभरात आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. बोर्डाने दिलेल्या सूचनेनुसार केंद्रावर अर्धा तास पोहोचण्यासाठी नागपूरमधील विविध केंद्रांवर पालकांनी गर्दी केली. अकरा वाजता पेपर असल्याने सकाळी दहाच्या सुमारास शिवाजी विज्ञान महाविद्यालय, धनवटे नॅशनल कॉलेज यासह सेंट पॉलसारख्या अनेक केंद्रांवर गर्दी वाढल्याने वाहतुकीची कोंडी  झाल्याचे चित्र दिसून आले. यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा  लागला. गर्दीला सांभाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून देण्यात आलेली तुटपुंजी व्यवस्थाही  कामी आली नाही. 

परीक्षा केंद्रांजवळ वाहतुकीची कोंडी 
नागपूर - शहरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांचे सिमेंटीकरण आणि मेट्रोच्या कामामुळे बऱ्याच केंद्रांवर वाहतुकीची कोंडी निर्माण होणार असल्याची परिस्थिती ‘दैनिक सकाळ’ने यापूर्वीच निदर्शनास आणून दिली होती. या वृत्ताची दखल घेत विविध संघटनांनी विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आवाहनही केले. शिवाय वाहतूक पोलिसांना निवेदन देत, सकाळी दहा ते अकरादरम्यान केंद्र परिसरात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. मात्र, मेट्रो आणि सिमेंट रस्त्याची कामे सुरू असलेल्या केंद्र परिसरात वाहनांची गर्दी दिसून आली. 

विद्यार्थ्यांना सोडून देण्यासाठी आलेल्या पालकांच्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांनी संपूर्ण परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. त्यामुळे इतर वाहनांना जाण्याचा रस्ताच बंद झाला होता. या वेळी अनेक पालकांनी अर्धा ते एक किलोमीटर दूर आपल्या दुचाकी आणि चारचाकी पार्क केली होती.

शिवाजी विज्ञान महाविद्यालयासमोर रस्ता अरुंद असल्याने वाहतूक खोळंबली होती. धनवटे नॅशनल कॉलेज, हडस हायस्कूल, एलएडी महाविद्यालय, धरमपेठ महाविद्यालयांसमोर बऱ्याच वाहनांची गर्दी असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. दुसरीकडे हुडकेश्‍वर येथील सेंट पॉल महाविद्यालयात सर्वाधिक विद्यार्थी असल्याने केंद्रापासून दूरपर्यत ‘ट्रॅफिक जॅम’ झाले होते.  त्यामुळे थोड्या उशिरा येणाऱ्यांना अक्षरश: पायी केंद्रापर्यंत जावे लागले. 

उशिरा येणाऱ्यांनाही प्रवेश 
बारावीच्या परीक्षेदरम्यान उशिरा येणाऱ्या प्रवेश देण्यात येणार नाही अशी भूमिका बोर्डाने घेतली होती. त्यामुळे केंद्रावर साडेदहा वाजता रिपोर्टिंग करण्यास सांगण्यात आले होते. यामुळे बऱ्याच पालकांनी दहा वाजतापासूनच केंद्रावर तळ ठोकला होता. मात्र, शहरातील वाहतुकीच्या कोंडीमुळे उशिरा आल्याने विद्यार्थ्यांना मानवीय दृष्टिकोनातून प्रवेश देण्याचे काम बऱ्याच केंद्रांवर करण्यात आले. 

वाहतूक पोलिस विभागाकडून असहकार्य
शहरातील काही केंद्रावर वाहतुकीची कोंडी होण्याची शक्‍यता असल्याने या केंद्रावर वाहतूक पोलिस विभागाकडून शिपायांची नियुक्त करण्याची गरज होती. विशेष म्हणजे काही शिक्षक संघटनांनी यासंदर्भात निवेदन देत, मागणी केली होती. मात्र, शिवाजी महाविद्यालय परिसरात  केवळ एक शिपाई देण्यात आला होता. शिपाई एकटा असल्याने परिसरात एकाचवेळी बऱ्याच प्रमाणात वाहने आल्याने परिसरातील गर्दी सांभाळणे त्याला कठीण झाले होते. त्यामुळे अशा परिसरात विभागाकडून किमान तीन ते चार शिपाई लावणे गरजेचे होते. दुसरीकडे सेंट पॉल शाळेसह इतर केंद्रावर वाहतूक विभागाकडून असे शिपाईच नेमले नसल्याचे आढळून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com