'पंतप्रधान मोदींना देशात होते बुद्धाचे विस्मरण'

'पंतप्रधान मोदींना देशात होते बुद्धाचे विस्मरण'

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा विदेशात जातात, त्या ठिकाणी तथागत सिद्धार्त भगवान बुद्ध आणि त्यांच्या अहिंसेचे तत्व सांगतात. बुद्धाची शिकवण त्यांना विदेशातच आठवते. मात्र, भारतात त्यांना बुद्धवाणीचे विस्मरण होते. बुद्ध विचार फारसा आठवत नाही, अशी खंत वर्ल्ड फेलोशिफ ऑफ बुद्धिस्ट युथचे उपाध्यक्ष भदन्त खेमचारा (त्रिपुरा) यांनी व्यक्त केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, संजीवनी ह्युमन डेव्हलपमेंट व आवाज इंडियाच्या वतीने शनिवारी दीक्षाभूमीवरील डॉ. आंबेडकर सभागृहात आयोजित पहिल्या पाली साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय भिख्खू भदन्त बोधीपालो महाथेरो होते. आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. भदन्त उपनंद, डॉ. भदन्त मेत्तानंद, डॉ. प्रफुल्ल गडपाल (उत्तराखंड), डॉ. राजेश चंद्रा (लखनऊ), संघमित्रा जाधव, अमन कांबळे, प्रीतम बुलकुंडे उपस्थित होते.
देशभरातील बौद्ध एकच आहेत; मात्र बौद्ध बांधवांमध्ये वास्तव्य असलेल्या संस्कृतीचा प्रभाव जाणवतो.

 महाराष्ट्रात नवबौद्ध, तर हिमाचलमध्ये इतर नामविधान लावले जाते. बुद्धाला माणणारे जगभरातील बौद्ध एकच आहेत आणि पाली भाषा ही तथागताच्या विचारांची वाणी आहे. यामुळे समस्त बौद्धांची बोली भाषा पाली व्हावी. बुद्ध विहारातून पाली भाषेचे संस्कार व्हावे, असेही भदन्त खेमचारा म्हणाले.

डॉ. आंबेडकर यांनी दिलेला विज्ञानवादी बुद्धाचा धम्म जगभरात पोहोचविण्याची गरज आहे. विज्ञानाच्या पुढे बुद्ध धम्म आहे. यामुळेच जगाने हा धम्म स्वीकारला आहे, असे भदन्त बोधीपालो म्हणाले. डॉ. प्रफुल्ल गडपाल, डॉ. राजेश चंद्रा यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रितम बुलकुंडे व बीजभाषण भदन्त मेतानंद यांनी केले. संचालन प्रा. निलिमा चव्हाण यांनी केले. 

पाली भाषेच्या संवर्धनासाठी ५ कोटी
तथागत बुद्धाच्या धम्म ज्ञानाची भाषा पाली आहे. या भाषेचे संवर्धन करणे, भाषेचा प्रसार व प्रचार करणे ही आमची जबाबदारी आहे. महाराष्ट्रात पाली विद्यापीठाची मागणी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. पाली भाषेच्या संशोधन व संवर्धनासाठी पाच कोटी रुपये सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येतील, असे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी पाली साहित्य संमेलनात सांगितले. पाली साहित्य संमेलनाच्या माध्यमातून जनमानसात पाली भाषा पेरण्याचे काम सुरू झाले आहे, असेही बडोले म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com