संमेलनाध्यक्षपदासाठी चार उमेदवार रिंगणात

संमेलनाध्यक्षपदासाठी चार उमेदवार रिंगणात

काळे, दवणे, कुळकर्णी व घुमटकर यांचे अर्ज

नागपूर - डोंबिवली येथे होणाऱ्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकूण चार उमेदवार रिंगणात उतरले आहेत. नागपूरचे डॉ. अक्षयकुमार काळे व डॉ. मदन कुळकर्णी, ठाण्याचे प्रवीण दवणे आणि पुण्याचे डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचा यामध्ये समावेश आहे. 

संमेलनाध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीचे अर्ज आज (बुधवार) सायंकाळी ५ पर्यंत स्वीकारले जाणार होते. त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण चार उमेदवारांनी आठ अर्ज सादर केले. डॉ. अक्षयकुमार काळे यांनी नागपूर, औरंगाबाद व पुण्यातून, प्रवीण दवणे यांनी पुणे व मुंबईतून, डॉ. मदन कुळकर्णी यांनी नागपुरातून तर डॉ. जयप्रकाश घुमटकर यांनी पुण्यातून उमेदवारी अर्ज भरले. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा निवडणुकीच्या बाबतीत फारसा उत्साह दिसला नाही. अनेकांची नावे पुढे आली, चर्चाही झाली. 

मात्र, अखेरच्या क्षणापर्यंत केवळ चारच अर्ज दाखल झाले. यासाठी संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीतील राजकारण, प्रचारात होणारे आरोप-प्रत्यारोप आणि विविध वादांनी संमेलन गाजणे ही महत्त्वाची कारणे असल्याचे बोलले  जात आहे. १७ ऑक्‍टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. यापैकी कोण एक पाऊल मागे  घेतो, याबाबत उत्सुकता कायम असेल. डॉ. मदन कुळकर्णी यांच्या बंद लिफाफ्याचे रहस्यदेखील आज उलगडले. त्यांनी बंद पाकिटात दोन अर्ज सादर केले. दोन्हींवर सूचक व अनुमोदक  सारखेच आहेत. परंतु, त्यांची नावे कुणाला कळू नये म्हणून गुप्तता राखण्यात आली होती. सूचक-अनुमोदकांची नावे कळल्यानंतर वैदर्भी साहित्य वर्तुळात काही प्रमाणात चर्चा रंगू लागली आहे. 

कसबे यांचा विचार का बदलला?
यंदा संमेलनाध्यक्षपदासाठी ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब कसबे इच्छुक होते, हे संपूर्ण साहित्य विश्‍वाला ठाऊक आहे. त्यांनी स्वतःदेखील जवळच्या काही लोकांशी संपर्क साधून तसे संकेत दिले होते. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याच्या काही दिवसांपूर्वीपर्यंत त्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, काळे व कसबे यांची ‘फ्रेंडलिस्ट’ बऱ्यापैकी कॉमन असणे आणि कसबेंच्या पाठीशी उभे राहू शकणारे प्रभावी लोक ‘स्थानिक’ तसेच काळेंचे निकटवर्तीय असणे, अशा काही कारणांनी पेंच निर्माण केला होता. त्यात रावसाहेब कसबे यांनी एक पाऊल मागे घेऊन ‘बिनविरोध निवडून आलो तरच अर्ज भरेन’ अशी भूमिका जाहीर केली असावी, असे बोलले जात आहे. परंतु, काही दिग्गज साहित्यिक कसबेंच्या उमेदवारीसाठी कंबर कसून असताना ऐनवेळी त्यांचा विचार का बदलला, हा प्रश्‍न कायम आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com