शंभर टक्‍के शाळा वाय-फायचे "मिशन 2019' फेल

file photo
file photo

नागपूर : सन 2019 पर्यंत राज्यातील 43 हजार गावांना इंटरनेटशी जोडण्याचा संकल्प सरकारने 2017 मध्ये केला होता. यातून सर्वच डिजिटल शाळांत वाय-फाय राहील, असे लक्ष्य निर्धारित करण्यात आले. मात्र, वर्ष 2019 अर्ध्यावर आले तरीही शिक्षण खात्याकडून शाळा वाय-फाय करण्याची कोणतीही हालचाल दिसून येत नाही. यावरून 100 टक्‍के शाळा वाय-फायचे "मिशन 2019' हे फेल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, डिजिटल शाळा प्रकल्प हा फक्‍त जुमला असल्याची विरोधकांकडून टीका होत आहे.
डिजिटल इंडियाअंतर्गत देशातील ग्रामीण भाग इंटरनेटशी जोडण्याचा केंद्र सरकारचा प्रकल्प आहे. यातूनच डिजिटल शाळा प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतला. या प्रकल्पाची सरकार पातळीवर मोठी प्रसिद्धी करण्यात आली. यातून शिक्षकांना वेठीस धरण्याचे प्रकारही झाले. प्रत्येक शिक्षकास टार्गेटही देण्यात आले. एवढेच नव्हे, तर शिक्षकांना "टीससॅव्ही' म्हणून नोंद करण्याची सूचनाही देण्यात आली. त्यानुसार 1 लाख 3 हजार शिक्षकांनी संकेतस्थळावर टीससॅव्हीची नोंद केली.
डिजिटल शाळा प्रकल्पाचा गाजावाजा करण्यात आला; मात्र काम होताना दिसून आले नाही. राज्यातील 1 लाख 6 हजार 527 शाळांना डिजिटल करण्याचे धोरण शासनाने जाहीर केले. तसेच 36 जिल्ह्यांतील 43 हजार 661 गावांमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्याची घोषणा 2017 मध्ये केली. यात 2019 पर्यंत सर्व शाळांमध्ये वाय-फाय सुविधा असेल, असेही महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने पत्रकात म्हटले होते. सरकारच्या या घोषणेचे सर्वत्र स्वागत करण्यात आले. मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये ग्रामीण भागातील शाळा डिजिटल तर सोडाच, त्या शाळांमध्ये साधी विद्युत सुविधापण नाही. यामुळे या प्रकल्पाचाच बट्ट्याबोळ झाल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील शाळांकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यातून खरा असल्याचे स्पष्ट होत आहे. एवढेच नव्हे, तर सरकार शाळाही बंद करीत असल्याचे दिसून येत आहे.
80 हजार शाळा बंद करण्याचे धोरण
सरकार शिक्षण क्षेत्रात दररोज काहीना काही प्रयोग करताना दिसत आहे. ग्रामीण भागात विद्यार्थी मिळत नाही आणि शिक्षकांचा पगार देता येत नाही म्हणून त्या शाळाच बंद करण्याची घोषणा केली. राज्यातील 80 हजार सरकारी शाळा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचे संकेत शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदूकुमार यांनी दिले होते. मात्र, सरकारवर समाजमाध्यमातून टीकेची झोड उठल्यानंतर शाळा बंद होणार नाही, अशी ग्वाही शिक्षणमंत्र्यांनी दिली. तरीही पाच हजारांपेक्षा अधिक सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय सरकार पातळीवर झाल्याची चर्चा आहे. डिजिटल शाळा करण्याचा हा सरकारचा फक्‍त देखावा असल्याचे यातून स्पष्ट दिसून येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com