मोदी सरकारचे आर्थिक धोरण दिशाहीन : सी. एच. वेंकटाचलम

खामला ः ऑल इंडिया बॅंक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनच्या आठव्या द्विवार्षिक अधिवेशनाचे दीपप्रज्वलन करून उद्‌घाटन करताना गणेश देवी व कॉ. सी. एच. वेंकटाचलम, देवीदास तुळजापूरकर.
खामला ः ऑल इंडिया बॅंक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनच्या आठव्या द्विवार्षिक अधिवेशनाचे दीपप्रज्वलन करून उद्‌घाटन करताना गणेश देवी व कॉ. सी. एच. वेंकटाचलम, देवीदास तुळजापूरकर.

नागपूर : मोदी सरकारच्या दिशाहीन आर्थिक धोरणामुळे उद्योग, कृषी क्षेत्र अडचणीत आले असून, बेरोजगारी वाढली. या परिस्थितीत "सबका साथ सबका विकास' कसा होणार, असा सवाल उपस्थित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक धोरणावर अखिल भारतीय बॅंक कर्मचारी संघटनेचे महासचिव कॉ. सी. एच. वेंकटाचलम यांनी आज टीकास्त्र सोडले. ऑल इंडिया बॅंक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनच्या आठव्या द्विवार्षिक अधिवेशनाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सुधीर कुडपले तर प्रमुख पाहुणे म्हणून पद्मभूषण थोर साहित्यिक गणेश देवी, राष्ट्रीय महासचिव देवीदास तुळजापूरकर, महासचिव राजीव तभाने, महासचिव जयवंत गुर्वे, सुरेश बोबाटे, स्वागताध्यक्ष व्हीएनजे शर्मा उपस्थित होते. वेंकटाचलम म्हणाले, केंद्र सरकार मित्रो म्हणत असले तरी वाढत्या महागाईमुळे हे सरकार मित्र आहे की शत्रू हे कळत नाही. नवीन आर्थिक धोरणामुळे अत्यावश्‍यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यावर नियंत्रणासाठी कोणतीही ठोस पावले उचलण्यात येत नाही. असे असताना बेरोजगारी वाढत आहे. शहरी नक्षलवाद मुद्दा उपस्थित केला जात आहे. बेरोजगारी कमी करण्याऐवजी ती कमी करण्याच्या दृष्टीनेच केंद्र सरकार पावले टाकत आहे. कंत्राटी पद्धतीने रोजगार उपलब्ध करून देण्याचे धोरण सरकार आखत आहे, हे दुर्दैव आहे. देशाची 65 टक्के अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. तेच क्षेत्र अडचणीत असून, त्याला प्रोत्साहन देण्याचे कोणतेच धोरण नाही. कृषी, औद्योगिक क्षेत्रही मंदीच्या गर्तेत आहे. त्यामुळे रोजगार निर्मिती प्रभावीत झाली. नोकऱ्यांवरच गदा आलेली असताना विकास कसा साधणार याबद्दल सरकार चुप्पी साधून आहे. राष्ट्रीयकृत बॅंकेच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना वेंकटाचलम म्हणाले, बॅंकांचे एनपीए वसूल करण्यासाठी ठोस पावले उचलली जात नाही. बॅंकांचे राष्ट्रीयीकरण देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी केले होते. परंतु, मोठ्या कॉर्पोरेट घराण्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या पैशाची लूट केली. ज्या बॅंकांचे राष्ट्रीयीकरण केले त्या बॅंका पूर्वी खासगी होत्या. त्यामुळेच सध्या देशात असलेल्या सर्वच खासगी बॅंकांचेही राष्ट्रीयकरण करावे. खासगी बॅंकांचा देशाच्या विकासात हातभार शून्य आहे, असे सांगून राष्ट्रीयकृत बॅंकांमुळेच सर्वसामान्य नागरिकांचा पैसा सुरक्षित आहे. त्यामुळेच बॅंकांचे राष्ट्रीयीकरण आवश्‍यक असल्याचे ते म्हणाले. देवीदास तुळजापूरकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कामगारांचे नेते होते. त्यांनी तयार केलेल्या संविधानामुळे मत प्रदर्शनाचे स्वातंत्र मिळाले. नागपुरात केंद्र शासनाचे रिमोर्ट कंट्रोल असल्याने त्याला आव्हान देण्याची तयारी करायला हवी, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्वागत भाषण व्हीएनजे शर्मा यांनी केले. संचालन स्वयंप्रकाश तिवारी यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com