राममंदिर होणार नाही, असे मोदी म्हणालेच कुठे? - सरसंघचालक 

राममंदिर होणार नाही, असे मोदी म्हणालेच कुठे? - सरसंघचालक 

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिलेल्या महामुलाखतीत, "न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अयोध्येत राममंदिराच्या बांधकामासाठी अध्यादेश काढण्याविषयी विचार केला जाईल', असे म्हटले होते. याबाबत विचारले असता, "मोदींनी राममंदिर होणार नाही, असे कुठेही म्हटलेले नाही. फक्त न्यायालयीन प्रकियेनंतर विचार करू, असे म्हटले. त्यामुळे मंदिर होईलच,' अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना मांडली. 

रमाबाई रानडे स्मृती शिक्षण-प्रबोधन पुरस्कार वितरण सोहळ्याला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सरसंघचालक पत्रकारांशी बोलत होते. "अयोध्येत राममंदिर व्हावे, ही रामाची इच्छा आहे आणि माझा रामावर पूर्ण विश्‍वास आहे,' अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. राम मंदिराला वेळ होतोय असे वाटत नाही का, असा सवाल केला असता, "राम मंदिराचा मुद्दा 69 वर्षांपूर्वीचा आहे. त्यामुळे तसाही वेळ झालेलाच आहे; पण आता अधिक वेळ होणार नाही. कारण वेळ कधीही बदलू शकते,' असे सूचक वक्तव्य सरसंघचालकांनी केले. 

भैयाजींची भूमिका योग्य 
सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना राममंदिरावर संघ ठाम असल्याचे म्हटले होते, तर सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी ट्‌विट करून "भाजपने 2014 च्या जाहीरनाम्यात राममंदिराचे आश्वासन दिले होते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना अयोध्येत राम मंदिर बांधावे लागेल,' अशी भूमिका मांडली होती. त्याविषयी विचारले असता, "होसबळे हे सहसरकार्यवाह आहेत, भैयाजी जोशी हे सरकार्यवाह आहेत आणि मी सरसंघचालक आहे. भैयाजींनी मांडलेली भूमिका योग्य असून, तीच माझीही भूमिका आहे', असेही डॉ. भागवत यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com