24 तासांत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम

file photo
file photo

यवतमाळ, : महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. सोमवारी, (ता. 24) राळेगाव व दिग्रस शहरातील 168 शेतकऱ्यांची यादी "आयटी' विभाग प्रसिद्ध करणार आहे. शेतकऱ्यांचे या ठिकाणी प्रमाणिकरण झाल्यानंतर 24 तासांत त्यांच्या खात्यात कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून शेतकरी सातत्याने दुष्काळाच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. कोरडा व ओल्या दुष्काळाचे संकट शेतकऱ्यांवर कायमचे घोंघावत आहे. परिणामी, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अडचणीत आली आहे. अशा शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली. एक एप्रिल 2015 ते 30 सप्टेंबर 2019 या काळातील दोन लाख रुपयांपर्यंत थकबाकी अल्पमुदतीचे पीककर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. यादृष्टिने प्रशासन गेल्या काही महिन्यांपासून कामाला लागले आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी बॅंक, महसूल विभागाने तयार केली असून, सहकार विभागाकडे देण्यात आली आहे. यानंतर ही यादी "आयटी' विभागाकडे पाठविण्यात आली आहे. 

 "ट्रायल रन' घेतले जाणार 

"आयटी' विभागाकडून सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोमवारी (ता.24) जिल्ह्यातील दोन तालुक्‍यांतील पहिली यादी पाठविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देताना अडचणी येऊ नये, यासाठी राळेगाव व दिग्रस या दोन तालुक्‍यांत "ट्रायल रन' घेतले जाणार आहे. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रमाणिकरण करताना काय अडचणी येतात, याची माहिती तपासली जाणार आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रमाणिकराचा "थम'दिल्यानंतर 24 तासांत कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या ठिकाणी "सीएससी' केंद्रावर जाऊन शेतकऱ्यांना प्रमाणिकरण करून द्यावे लागणार आहे. यादी प्रसिद्ध केल्यानंतर त्रुटी राहिल्यास गोंधळ होऊ नये म्हणून दोन ठिकाणी ही "ट्रायल'घेतली जाणार आहे. 

तर द्यावे लागणार स्वयंघोषणापत्र

आधार कार्ड क्रमांक, बॅंक खाते, कर्जमुक्तीची रक्कम यात तफावत आढळल्यास स्वयंघोषणापत्र देऊन दुरुस्ती करता येणार आहे. ज्यांची त्रुटी नसेल, अशा शेतकऱ्यांनाही माहिती पाहून तशा पद्धतीचे संमतीपत्र द्यावे लागणार आहे. 

एक लाख शेतकरी पात्र

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील एक लाख आठ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यांना 745 कोटी 67 लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. यात त्यात राष्ट्रीयीकृत बॅंकांचे 76 हजार, विदर्भ ग्रामीण कोकण बॅंकेचे दहा हजार, खासगी एक हजार पाचशे तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या 19 हजार 406 शेतकऱ्यांचा समावेश आहे.

साडेपाच हजार अपलोडींग बाकी

जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचे अपलोडींगची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत एक लाख दोन हजार शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. यातील साडेपाच हजार शेतकऱ्यांची माहिती अपलोडींग बाकी असून त्यांचे काम सुरू आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com