गडचिरोली - जिल्ह्यात राज्यपाल, मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री येण्याच्या पूर्वसंध्येलाच माओवाद्यांनी पोलिस खबरी असल्याच्या संशयातून तीन जणांची हत्या केली. लटा मडावी (35, रा. रुमालकसा), पदाडी आत्राम (36, रा. गुर्जा, ता. अहेरी) व तलवारसाय कुंजाम (रा. अलोंडी, ता. कोरची) अशी मृतांची नावे आहेत.
गुरुवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास सशस्त्र नक्षलवादी लटा मडावी व पदाडी आत्राम यांच्या गावी गेले. दोघांना गावाबाहेर नेऊन त्यांची हत्या केली. दोघेही एसपीओ म्हणून काम करत होते, अशी माहिती आहे. तसेच कोरची तालुक्यातील अलोंडी येथील तलवारसाय कुंजाम याचीही नक्षल्यांनी 11 वाजताच्या सुमारास हत्या केली. आठवडाभरापूर्वीच नक्षल्यांनी सुरजागड येथील लोहखनिज प्रकल्पाच्या कामांवरील 80 वाहने जाळली होती. त्यानंतर दोघांची हत्या केल्याने दक्षिण गडचिरोलीत नक्षल्यांची दहशत वाढल्याचे दिसून येत आहे.
|