मध्य प्रदेशच्या धर्तीवर हमीभाव द्यावा 

मध्य प्रदेशच्या धर्तीवर हमीभाव द्यावा 

नागपूर - केंद्र आणि राज्याच्या कृषी मूल्य आयोगाकडून सूचविण्यात येणाऱ्या शेतमालाच्या भावामधील तफावतीची रक्कम देण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे. याच धर्तीवर राज्य शासनानेही शेतमालाला भाव द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते  आणि विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी   रविभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

सर्वच स्तरावर अपयशी झाल्यामुळे राज्य सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसतर्फे ‘जनआक्रोश’ रॅली राज्यभर काढली जाणार आहे. या संदर्भात विदर्भातील काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांची बैठक रविभवन येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, राज्यातील शेतकरी हवालदिल झाला असून तो आत्महत्या  करीत आहे. सरकारने कर्जमाफीचे आश्‍वासन दिले. मात्र, पैसा न देता त्यांच्या जखमेवर एक  प्रकारे मीठ चोळण्याचेच काम केले आहे. आता सरकारने कापसाला सात हजार तर सोयाबीनला पाच हजार रुपये प्रतिक्विंटल भाव द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. ते म्हणाले, राज्य शासनाच्या कृषी मूल्य आयोगाकडून हमीभावासंदर्भात जी शिफारस केली जाते. त्यात आणि केंद्र  शासनाकडून देण्यात येणाऱ्या प्रत्यक्ष हमीभावात बरेच अंतर असते. त्यामुळे दोन्ही आयोगाच्या अहवालातील तफावतीची रक्कम शासनाने दिली पाहिजे. मध्य प्रदेश शासनाने तशी व्यवस्था केली आहे. कापूस, सोयाबीन आणि धान पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी आर्थिक मदत देण्याची मागणीही त्यांनी केली. कीटकनाशकाच्या फवारणीत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये देण्याची मागणी केली. विशिष्ट कंपन्यांचा कोळसा घेण्यासाठी वीज संकट निर्माण केल्याचा आरोपही त्यांनी केला. या वेळी विधानसभेतील उपगट नेते विजय वडेट्टीवार, वसंत पुरके, शिवाजी मोघे आदी उपस्थित होते. 

जनआक्रोश मोर्चा
३१ ऑक्‍टोबरला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती असून राज्यातील भाजप, सेनेच्या युती सरकारलाही तीन वर्षे पूर्ण होत आहेत. तर ८ नोव्हेंबरला नोटाबंदीच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण  होत आहे. नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. यामुळे काँग्रेसकडून राज्यभर जनआक्रोश रॅली काढण्यात येणार आहे. ३ नोव्हेंबरला अहमदनगर येथून रॅलीला सुरुवात होणार आहे. प्रत्येक विभागात ही रॅली काढण्यात येणार असून याचा समारोप ८ नोव्हेंबरला सांगली येथे होणार आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान लाखो शेतकऱ्यांचा मोर्चा विधानभवनावर काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com