शेतकऱ्यांकडे २९१ कोटींची थकबाकी

शेतकऱ्यांकडे २९१ कोटींची थकबाकी

नागपूर - राज्यातील कृषिपंपांची वाढती थकबाकी महावितरणची डोकेदुखी वाढविणारी ठरली आहे. केवळ नागपूर आणि वर्धा जिल्ह्याचा विचार केल्यास मार्चअखेर १ लाख ५६ हजार शेतकऱ्यांकडे तब्बल २९१ कोटींचे वीजबिल थकीत आहे. थकबाकी वसुलीसाठी महावितरणतर्फे विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. चालू देयके न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणने दिला.

नापिकीच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा म्हणून कर्जमाफी देण्याची घोषणा सरकारने केली. कर्जमाफीची रक्कम अद्याप एकाही शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाली नाही. मात्र, महावितरणसह वेगवेगळ्या यंत्रणा थकबाकी वसुलीसाठी सक्रिय झाल्या आहेत. महावितरणनेसुद्धा कृषिपंपांची थकबाकी वसूल करण्यासाठी कार्यक्रमाची आखणी केली. 

कृषिपंपांचे वीजबिल भरण्याची कुवत असलेले शेतकरीही बिलाची रक्कम भरत नसल्याचा दावा महावितरणने केला. नागपूर ग्रामीण विभागाचा विचार केल्यास मार्चपर्यंत काटोल विभागात ३३ हजार ८५१ शेतकऱ्यांकडे ६९ कोटी, मौदा विभागातील १२ हजार ७२४ शेतकऱ्यांकडे ४६.५५ कोटी, नागपूर ग्रामीण विभागातील २१ हजार ६२१ शेतकऱ्यांकडे ५५.२५ कोटी, सावनेर विभागात १२ हजार ८५५ शेतकऱ्यांकडे १०.३२ कोटी, नागपूर शहर मंडळ कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या बुट्टीबोरी विभागातील ७ हजार ६२४ शेतकऱ्यांकडे २३.९४ कोटी, वर्धा जिल्ह्यातील ६८ हजार २०१ शेतकऱ्यांकडे ८६.१२ कोटींची थकबाकी आहे.

नागपूर व वर्धा जिल्ह्यातील ऑक्‍टोबर २०१६ ते सप्टेंबर २०१७ दरम्यान एकूण १४ हजार ५०६ ग्राहकांनी ३ कोटी ६० लाख रुपयांचा भरणा केला असून हा फारच अत्यल्प असल्याचे महावितरणने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com