नागपूर...तुला महापौरांवर भरोसा नाय काय ! 

नागपूर...तुला महापौरांवर भरोसा नाय काय ! 

नागपूर - आरजे मलिष्काच्या "मुंबै तुला बीएमसीवर भरोसा नाय काय..' या गाण्याने मुंबई महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले. आज नागपूर महापालिकेच्या सभागृहात नगरसेवकांनी महापौर नंदा जिचकार यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. समस्येबाबत फोन केल्यास महापौर मॅडम फोन उचलत नाही, तुम्हाला सभागृह चालविता येत नाही, असे आरोप नगरसेवकांनी केले. त्यानंतर लगेच सभागृहाबाहेर काही जणांनी हास्यविनोदात मुंबईत सेनेची झोप उडविणाऱ्या या गीताचे "नागपूर...तुला महापौरांवर भरोस नाय काय', असे विडंबन केले. 

स्थगन प्रस्ताव नाकारल्याने प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी महापौरांवर सभागृहाच्या कामकाजाच्या नियमावलीची पायमल्ली केल्याचा आरोप केला. त्याआधी प्रश्‍नोत्तराच्या तासात रमेश पुणेकर यांनी प्रभाग 20 मधील अनेक वस्त्यांत पाणीपुरवठा होत नसल्याकडे लक्ष वेधले. पाणी येत नसल्याने अधिकाऱ्यांकडे तक्रार करायची तर ते फोन उचलत नाही, असे वास्तव पुणेकर यांनी मांडले. प्रभाग 20 चे नेतृत्व उपमहापौर दीपराज पार्डीकर करीत असून त्यांचाही फोन अधिकारी उचलत नाही. पाणीटंचाईबाबत महापौर तुम्हीही फोन उचलत नाही, असा थेट आरोपही पुणेकरांनी केला. 

पाण्याचा प्रश्‍न आल्याने अनेक नगरसेवक बोलायला उठले. त्यापैकी एक कमलेश चौधरीही होते. या वेळी महापौरांनी नगरसेवकांना बसायला सांगितले. त्यामुळे चिडलेले कमलेश चौधरी यांनी नागरिकांची ओरड असताना समस्याही मांडायच्या नाही काय? बोलण्यासाठी उभे झालेल्या कुणालाही बोलू दिले जात नाही. तुम्हाला सभागृह चालवित येत नाही, असा आरोप केला. अखेर या प्रकरणात महापौरांनी कार्यकारी अभियंत्यांना प्रभाग 20 मधील वस्त्यांचा दौरा करून तोडगा काढण्याचे निर्देश दिले. 

दूषित पाण्यासाठी उपाय करा! 
शहराच्या अनेक वस्त्यांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असून महापालिका शुद्ध पाण्यासाठी कर घेते. त्यामुळे जेवढ्या काळासाठी दूषित पाणीपुरवठा झाला, त्या काळातील बिल माफ करणार काय? असा सवाल प्रफुल्ल गुडधे-पाटील यांनी केला. यावरूनही इतर सदस्यांनी प्रश्‍नांचा भडिमार केला. महापौरांनी दूषित पाणीपुरवठ्याबाबत एक महिन्यात तपासणी करून समस्या निकाली काढण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. 

अभय योजना फसण्याचा धोका 
पाणी कराची थकीत रक्कम भरण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या अभय योजनेची माहिती देण्यासाठी गेल्यानंतर नागरिक दूषित पाण्याबाबत जाब विचारत असल्याकडे पुरुषोत्तम हजारे यांनी लक्ष वेधले. या योजनेची जाहिरात करताना नगरसेवकांना त्रास होत असून नागरिकांना उत्तर देणे कठीण झाले आहे, त्यामुळे ही योजना फसण्याची शक्‍यता हजारे यांनी व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com