हाताले काम मिळालं तं आमची  चूल पेटते... नाय तं पोटात आग...

हाताले काम मिळालं तं आमची  चूल पेटते... नाय तं पोटात आग...

नागपूर - 'सायेब... सोतंत्र्य झालो न जी... पर अजूनही पारध्यांना चोर समजतत जी. आमी पोट भरण्यासाठी हरप्रकारचे कष्ट करतो. अरं बाबा... हाताले काम मिळालं तर आमची पालांमधी चुल पेटते, नायत पोटात आग... अस रस्त्यावरचं जीनं असूनही शिकलेल्या लोकायनं आमच्या लेकरायचे शिकवणं सोडून, आम्हाले हाकलत... आमचं वणवण भटकणं कधी बंद होईल जी... कधी आमच्या हातातील कटोरं जाईल... कधी शिकारीसाठी जाळं लावणं थांबलजी... साऱ्या गावकऱ्यांनी आम्हाले रात्री चोरं ठवरलं...पोलिसांनी हुसकावून लावलं...' ही व्यथा वर्धा जिल्ह्यतून राजुलवाडीच्या आश्रयाला आलेल्या पारधी बांधवांनी व्यक्त केली. 

देशभरात दिवाळीचा आनंद ओसंडून वाहत असताना वर्धा जिल्ह्यातील निरगुडी गावाच्या वेशीवर असलेल्या पारध्यांच्या पाच पालातील कुटुंबांना पोलिसांच्या मदतीने हुसकवून लावल्याचा प्रकार पुढे आला. वर्धा जिल्ह्यातून हे सारे पारध्यांची लेकरं, बाया पापडी राजुलवाडीच्या आश्रयाला आली. येथील सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल राजपुत आणि त्यांचा मुलगा नरेंद्र राजपुत यांनी राजुलवाडीतील बांधवांकडून मदत मिळवून दिली. सद्या हे पाचही पालातील कुटुंब राजुलवाडीत आश्रयाला आहेत.  

निसर्गाच्या कुशीत आणि उघड्यावर जगत आलेला समाज म्हणजे पारधी. माळरानावर कुठेतरी काट्याकुट्यांची झोपडी लावून त्यातच आपलां निवारा शोधणारा पारधी. लोकांकडून मागून आणलेलं धान्य जमवणं, लोकांच्या शेतीची राखण करणं आणि पोट भरणं हेच त्यांच्या निर्वाहाचं साधन. वणवण भटकणं तर भीक मागणं, गावाशेजारी शिकारीसाठी जाळं लावणं, फासे लावणं हा त्याचा व्यवसाय. आणि नाहीच मिळालं अन्न तर उपाशीच झोपणं हा त्याच्या आयुष्यातील प्रवास स्वातंत्र्याच्या साठीनंतरही सुरूच आहे. 

भांडण ठरलं कारणीभूत 
पारधी समाजातील नवराबायकोचं भांडण झालं. हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहचलं. गावकऱ्यांनी पोलिसांत पारध्यांविरोधात तक्रार केली. यांच्या भांडणामुळे सामान्य लोकांची झोपमोड होते. यामुळे या पारध्यांना येथून हाकलण्यात याव अशी एकमुखी मागणी केली. अखेर पोलिसांनी या पारध्यांना येथून हुसकावलं. 

पारध्यांना न्याय नाय भाऊ... आ आजचं तर भागलं, पण उद्याचं काय... असा भुकेचा पारध्यांचा प्रश्‍न अजून सुटला नाही. परंतु आमच्यामागे पोलिसी अत्याचारासोबतच सर्वच समाजाचा रोष असतो. आमच्या जमातीचं कोणी आयकुनच घेत नाय. पोलिस असो की गावकरी सारेच आमच्यावर बहिष्कार टाकतात.
- पन्नालाल राजपुत, राजुलवाडी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com