पोलिसांनी विश्‍वासार्हता जपावी - मुख्यमंत्री

पोलिसांनी विश्‍वासार्हता जपावी - मुख्यमंत्री

नागपूर - शहरातील नागरिकांचा पोलिसांवरील विश्‍वास वाढला आहे. पोलिसांनी एवढ्यावरच न थांबता तो विश्‍वास सार्थ करण्यासाठी प्रयत्न करावे. यामुळे पोलिसांवरील जबाबदारी आता वाढल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्‍त केले. 

पोलिस विभागातर्फे परसिस्टन्स हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. खासदार अजय संचेती, महापौर नंदा जिचकार, आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, सुनील केदार, प्रकाश गजभिये, प्रा. अनिल सोले, समीर मेघे, परिणय फुके, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर  विद्यापीठाचे कुलगुरू सिद्धार्थविनायक काणे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, महापालिका आयुक्त अश्विन मुद्‌गल, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, नागरिकांनी पोलिसांचे प्रोग्रेस कार्ड बनविले आणि त्यात पोलिस उत्तीर्ण झाले. पोलिसांची प्रतिमा, कार्यपद्धती, सकारात्मकता आणि वागणूक या सर्व स्तरावर सामान्य नागरिकांनी मूल्यमापन केले आहे. नागपूर पोलिस आयुक्‍तांनी संपूर्ण महाराष्ट्र पोलिसांना नवी दिशा आणि विचार दिल्याचे त्यांनी नमूद केले. 

पोलिस आयुक्‍तांनी राज्यात प्रथमच वेगवेगळे उपक्रम राबिवले. त्यात महिलांसाठी भरोसा सेल, आर्थिक सेल, बडी कॉप, एन-ट्रॅक हे उपक्रम केवळ राबविलेच नाही तर अंमलबजावणी केली. भूमाफियाविरुद्ध एसीपी सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वातील एसआयटीने पीडितांना मोठा आधार दिला. गुन्ह्यांची संख्या, यशस्वी तपास आणि अपराध सिद्धीचे प्रमाण या पारंपरिक निकषासोबतच सामान्य जनतेत पोलिसांबद्दल असलेला विश्‍वास, तसेच कामाबद्दल करण्यात आलेल्या  सर्वेक्षणातून मूल्यमापन करण्यात आले. या सर्वेक्षणामुळे सकारात्मक बदलासोबतच पुढील  दिशाही ठरणार आहे. 

तिरपुडे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत आधुनिक व तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण सर्वेक्षण केले. प्रास्ताविक सहायक पोलिस आयुक्‍त डॉ. अश्‍विनी पाटील यांनी केले. संचालन डीसीपी राहुल माकणीकर तर आभार सहआयुक्‍त शिवाजी बोडखे यांनी मानले.

पासपोर्ट चोवीस तासांत
तेलंगणा राज्यात पाच दिवसांत पासपोर्ट दिला जातो. तसेच नागपुरातही पासपोर्ट देण्यात येण्यात येईल, असे आयुक्‍तांनी भाषणात म्हटले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी पाच दिवसांचा अवधी चोवीस तासात आणण्यास सांगितले. त्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com