'सोलापूर विद्यापीठाला अहल्यादेवींचे नाव'

'सोलापूर विद्यापीठाला अहल्यादेवींचे नाव'

नागपूर - धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी संवैधानिक तरतुदींचे पालन करीत प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. धनगर आरक्षणाचा दिलेला शब्द पूर्ण करणारच, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकरांचे नाव देण्याची घोषणाही त्यांनी या वेळी केली. 

धनगर समाज संघर्ष समितीतर्फे रविवारी स्नेहनगर मैदानावर आयोजित धनगर आरक्षण निर्णायक मेळाव्यात ते बोलत होते. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंधारणमंत्री राम शिंदे, मत्स्य, दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, खासदार डॉ. विकास महात्मे, गणेश हाके उपस्थित होते.   

मुख्यमंत्री म्हणाले, यापूर्वी केंद्राला पाठविलेल्या शिफारसपत्रात धनगर आरक्षणासाठी आवश्‍यक बाबींची पूर्तता करू शकत नसल्याचे नमूद करून समाजाची फसवणूक करण्यात आली. आता टीआयएसएसमार्फत सर्व पुराव्यांसह अहवाल तयार करण्यात येत आहे. डिसेंबरपर्यंत हा ऐतिहासिक अहवाल तयार होईल. त्यानंतर संवैधानिक तरतुदींचे पालन करून शिफारसपत्र केंद्राला पाठविण्यात येईल. लवकरच केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आरक्षण मिळवून घेतले जाईल. हे आरक्षण देताना काही विघ्नसंतोषी लोकांकडून आदिवासींना भडकविण्याचे काम सुरू आहे; पण आदिवासी आरक्षणाला बाधा निर्माण न करता धनगर समाजाला आरक्षण दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. हंसराज अहीर यांनी आरक्षण धनगर समाजाचा हक्क असल्याचे सांगून राज्याकडून धनगर आरक्षणाचा प्रस्ताव आल्यास मंजुरीसाठी उशीर लागू देणार नसल्याचे स्पष्ट केले. आरक्षणासाठी असे मेळावे घेतले जात असतानाच समाजाच्या आर्थिक व सर्वांगीण विकासासाठीही प्रयत्न होण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली. राम शिंदे यांनीही धनगर आरक्षणासाठी शासन प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.

आता अंत पाहू नका - डॉ. महात्मे
धनगरांच्या हिताच्या अनेक बाबी पहिल्यांदा करण्याचा मान या सरकारला आहे. मात्र, आरक्षणाचे आश्‍वासन पूर्ण करण्याला तीन वर्षांचा विलंब झाला. आता अंत न बघता तातडीने शिफारसपत्र केंद्राला पाठविण्याची मागणी खासदार डॉ. विकास महात्मे यांनी केली. धनगर आरक्षण पक्ष हा एकच पक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

जानकर संतापतात तेव्हा...
महादेवराव जानकर यांनी भाषणाच्या प्रारंभीच धनगर बांधवांना संयम राखण्याची सूचना केली. त्यावर समाजबांधवांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली. यामुळे जानकरही संतापले. काँग्रेस-राष्ट्रवादीने तुम्हाला झुलविण्याचे काम केले. तुम्हाला फडणवीसच आरक्षण देतील आणि वाटत नसेल तर राजीनामा घेऊन टाका, अशी भाषा त्यांनी केली. यानंतर स्वत:ला सावरत त्यांनी भाषण पूर्ण केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com