ज्ञानाचा उपयोग सुधारणांसाठी करा - डॉ. अनिल सहस्रबुद्धे

ज्ञानाचा उपयोग सुधारणांसाठी करा - डॉ. अनिल सहस्रबुद्धे

नागपूर - ज्ञान ही सर्वश्रेष्ठ शक्ती आहे. पण, फक्त मर्यादित उपयोगाकरिता प्राथमिक ज्ञानाचा साठा करणे योग्य नाही. मात्र, जोपर्यंत या ज्ञानाचा उपयोग सामाजिक किंवा आर्थिक मूल्ये प्राप्त करून देणाऱ्या नवीन सुधारणा करण्याकरिता होत नाही तोपर्यंत त्याचा काहीही उपयोग नाही. त्यामुळे तुमच्या ज्ञानाचा उपयोग हा नवसुधारणांसाठी करा, असे आवाहन अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी केले.  

कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०४ व्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सि. प. काणे होते. या वेळी त्यांच्या हस्ते डॉ. कादेरा तालीब शेख (जुल्फी) आणि डॉ. मालती साखरे यांना डॉक्‍टर ऑफ लेटर्स (डी. लिट.) या पदवीने सन्मानित करण्यात आले. डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले की, आर्थिक विकासाकरिता ज्ञानाच्या स्थलांतरानेच जगामध्ये क्रांती घडवून आणली आहे. आपला देश जागतिक स्पर्धेत प्रत्येक स्तरावर सर्वांत पुढे जात असून यामुळे विविध विकासात्मक बदल मागील काही काळापासून आपल्या दृष्टिक्षेपात पडत आहे. हा बदल सर्वसमावेशक असल्याने विद्यार्थ्यांच्या योगदानाशिवाय अपूर्ण आहे. उच्च शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी देशाच्या जडणघडणीत मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत शिक्षक व पालकांचा मोठा वाटा असतो. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच यशप्राप्तीचा मार्ग सुकर होतो, असा सल्लाही त्यांनी दिला. या वेळी सर्वाधिक २० पदके पटकाविणारा जी. एच. रायसोनी विधी महाविद्यालयातील साहील श्‍याम देवानी, १६ पदके मिळविणारी गोंदिया येथील धोटे बंधू महाविद्यालयातील निशा देवानंद खोटेले तर १४ पदके पटकाविणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातील (शहर शाखा) शीतल कौशिदास वासनिक यांना सन्मानित करण्यात आले. 

प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम, परीक्षा नियंत्रक डॉ. नीरज खटी, विधी सभेचे सदस्य डॉ. मिलिंद बारहाते, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अंजली रहाटगावकर, विद्याशाखांचे अधिष्ठाता उपस्थित होते. 

आचार्य पदवींचा क्रम चुकला 
नव्या विद्यापीठ कायद्यानुसार आचार्य पदवी वाटप करण्यासाठी यावर्षीपासून चारच अधिष्ठाता व्यासपीठावर बसले होते. विज्ञान शाखेतील आचार्य पदवी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मात्र, त्यापैकी अभियांत्रिकी शाखेतून आचार्य पदवी मिळविणाऱ्यांच्या नावांची घोषणाच करण्यात आली नाही. यानंतर उर्वरित तिन्ही शाखांमधील नावांची घोषणा करण्यात आली. विद्यापीठाला ही चूक लक्षात येताच, त्यांनी अधिष्ठाता डॉ. जुगेल यांनी राहून गेलेल्या विद्यार्थ्यांच्या नावांची घोषणा केली. या प्रकाराने सर्वच अवाक झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com