नागपूर - भंडारा व गोंदिया जिल्ह्यात रेशीमचे उत्पादन होते. पारंपरिक पद्धतीने रेशीम साड्यांची निर्मिती केली जाते. या साड्यांना आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे जिओग्राफीकल इंडिकेशन (जीआय) मानांकन मिळाल्याने जागतिक बाजारपेठेचे दालन खुले झाले आहे.
भंडारा, गोंदिया व नागपूर जिल्ह्यांतील काही भागात आजन झाडावर रेशीमच्या अळ्या सोडल्या जातात. त्या झाडावर अळ्या रेशीम तयार करतात. या रेशीमला टसर सिल्क म्हटले जाते. ही या भागातील खूप जुनी पद्धत आहे. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी, तुमसर, साकोली, लाखनी, लाखांदूर, पवनी व नागपूर जिल्ह्यातील उमरेड या तालुक्यांमध्ये या साड्यांचे उत्पादन केले जाते; परंतु या साड्यांना बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने व्यवसाय वाढला नाही. राज्य हातमाग महामंडळाच्या पुढाकाराने या साड्यांना आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवून देण्याचा प्रयत्न केला. या महामंडळाच्या सातत्याने प्रयत्न केल्याने विदर्भातील या पारंपरिक कलेला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला आहे. या साड्यांची निर्मिती अजूनही पारंपरिक पद्धतीने केली जात असून, एक साडी तयार करण्यासाठी किमान सात ते आठ दिवस लागतात. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात या व्यवसायात जवळपास 200 कारागीर आहेत. या साड्यांना दिल्ली, कोलकाता या भागातही आता मागणी वाढत आहे.
या साड्यांना आता जीआय मानांकर मिळाल्याने या साडीची नक्कल करणे शक्य होणार नाही. या साडीसाठी लागणारा यार्न (धागा) आता इतर कारागीर करू शकणार नाही. भंडारा या भौगोलिक वातावरणात होणारे उत्पादन हे एकमेव ठरणार आहे. या साडीला केंद्र सरकारने विविध चार मानांकनेसुद्धा दिली असून, इंडिया हॅंडलूम ब्रॅंडचा दर्जा मिळाला आहे.
|