नागपूर - महाराष्ट्रातील शेतकरी नैसर्गिक आपत्ती व नापिकीला तोंड देत असताना आत्महत्या करीत आहेत. आत्महत्यांपासून परावृत करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी राज्य सरकारने संवेदनशील असावे, असा सल्ला भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी दिला.
वरूण गांधी एका कार्यक्रमासाठी नागपुरात आले असता शुक्रवारी पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्रात राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली आहे; परंतु यासाठी ठेवलेल्या अटी व शर्थी शेतकऱ्यांसाठी अडचणीच्या ठरत आहे. यामुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता "राज्यातील शेतकऱ्यांची दशा सुधारण्यासाठी प्रत्येक राज्य सरकारने संवेदनशील असावे,' असा सल्ला त्यांनी दिला. उत्तर प्रदेशमध्ये कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आपण स्वतः सव्वा कोटी रुपयांचा निधी दिला होता. इतर देणगीदारांकडून रक्कम जमा करून जवळपास चार हजार शेतकऱ्यांना 26 कोटी रुपयांच्या निधीचे वाटप केल्याचे त्यांनी सांगितले. असे प्रयोग होण्याची आवश्यकता असल्याचे वरुण गांधी म्हणाले.
खासदार वेतनासाठी स्वतंत्र आयोग
खासदारांचे वेतन व भत्ते ठरविण्यासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्यात यावा. यात राजकीय हस्तक्षेप नसावा, अशी मागणी त्यांनी केली. संसदेत वेतन वाढविण्याचा अधिकार खासदारांना नसावा, या मताचा मी आहे. संसदेचे कामकाज किती काळ चालते, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. आधीच्या सरकारमध्ये संसदेत वर्षातून 120 दिवस कामकाज होत होते. आताच्या सरकारमध्ये केवळ 60 दिवस कामकाज होत आहे. या स्थितीमध्ये खासदारांनी वेतन वाढवून घेणे कितपत सयुक्तिक ठरते, असा सवालही त्यांनी केला.
|