विनाअनुदानित प्राध्यापकांचा पेपर तपासणीवर बहिष्कार

Paper-Checking
Paper-Checking

नागपूर - राज्यातील बारावीच्या पेपरच्या तपासणीवर प्राध्यापकांनी बहिष्कार टाकला. यामध्ये विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्राध्यापकांनीही साथ देत, बहिष्कार म्हणून पेपरची तपासणी करण्यास नकार दिला आहे. ऐन वेळेवर जवळपास सर्वच विभागात प्राध्यापकांनी टाकलेल्या बहिष्कारामुळे बोर्डापुढे बारावीचे पेपर तपासणीचे संकट उभे राहिले असून, पुन्हा एकदा पेपरची तपासणी करण्यासाठी अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांची मनधरणी बोर्डाच्या अधिकाऱ्यांना करण्यात येत आहे. 

विभागात बारावीच्या परीक्षेला एक लाख ७४ हजार विद्यार्थी बसले. त्यानुसार जवळपास बारा लाखांच्या घरात उत्तरपत्रिकांचा समावेश आहे.

राज्यात ८४ लाख उत्तरपत्रिका तपासण्यात येणार आहेत. यासाठी पेपर संपताच प्राध्यापकांना तपासणीसाठी बोलाविण्यात आले होते. विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशनने टाकलेल्या बहिष्कारामुळे सुरुवातीला पेपरची तपासणी  बंद होती. यानंतर सरकारने हस्तक्षेप करीत मागण्या मान्य केल्याचे सांगताच पेपर तपासणी करण्यासाठी प्राध्यापकांकडून गठ्ठ्यांची उचल करण्यात आली. मात्र, अधिवेशन संपल्यावरही मागण्यांसंदर्भात वित्त मंत्र्यांकडून आश्‍वासनाची पूर्तता होत नसल्याचे बघताच, तपासणीसाठी नेलेले पेपर परत करणार नसल्याची भूमिका घेतली. या भूमिकेपाठोपाठ विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांनी तपासणीसाठी नेलेले पेपर बोर्डाकडे परत केल्याचे समजते.

त्यामुळे हे पेपर तपासणी करण्यासाठी बोर्डाकडून अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांची मनधरणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे मनधरणी करण्यात येणाऱ्या बऱ्याच प्राध्यापकांकडे अगोदरच पेपर असल्याने आणखी पेपरची तपासणी करायची कशी असा प्रश्‍न आता प्राध्यापकांसमोर येत आहे. त्यामुळे एका प्राध्यापकाने किमान किती पेपर तपासावे याबद्दलच्या नियमाला बोर्डाकडूनच तिलांजली देण्यात येत आहे.

बोर्डाकडून दबाव
अनुदानित प्राध्यापकांनी बारावीच्या पेपरची तपासणी करण्यासाठी बोर्डाकडून दबाव पद्धतीचाही वापर करण्यात येत आहे. विशेष म्हणजे खुद्द सचिव व वरिष्ठ अधिकारी प्राचार्य आणि प्राध्यापकांना संपर्क करून त्यांना बोलावून घेत असल्याचे समजते. त्यामुळे नाईलाजाने प्राध्यापकांना पेपर तपासणीसाठी जावे लागत आहे.

पेपर तपासणीसाठी अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक जात असले तरी, त्या उत्तरपत्रिका मागण्या पूर्ण होईपर्यंत बोर्डाकडे परत जाणार नाही. 
- अशोक गव्हाणकर, महासचिव, विजुक्‍टा.

बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम व्यवस्थित सुरू आहे. बरेचसे काम झालेले असून वेळेवर निकाल देण्यासाठी बोर्ड तयार आहे. 
- शशिकांत देशपांडे, सचिव, नागपूर विभागीय शिक्षण मंडळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com