नागपूर - दोघेही एकमेकांचे शेजारी. पहिल्याच नजरेत एकमेकांना हृदय दिले. जाती-पातीचे बंधन तोडून प्रेमविवाह केला. दहा वर्षे सुखाने संसार केल्यानंतर क्षुल्लक कारणावरून दोघांत वाद झाला. रागाच्या भरात पत्नी माहेरी गेली. पत्नीच्या विरहात पती हरीश संपतराव कुकडेने (32, रा. संजय गांधीनगर, हुडकेश्वर) गळफास घेतला. ही दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी हुडकेश्वरमध्ये उघडकीस आली.
हरीश याची दहा वर्षांपूर्वी गुलनाज (26) हिच्याशी ओळख झाली. प्रेमात आकंठ बुडालेल्या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कुटुंबीयांकडून विरोध होता. दोघांनीही प्रेमविवाह केला. त्यांच्या संसारवेलीवर दोन फुले उमलली. हरीशने ऑटो घेतला आणि संसाराच्या गरजा भागवू लागला. दोन पैसे जमा झाल्यानंतर गुलनाजने संसाराला हातभार लावण्याची धडपड सुरू केली. त्यामुळे हरीशने गुलनाजला घरीच किराणा दुकान टाकून दिले.
मात्र, हरीशला दारू पिण्याची सवय लागली. त्यानंतर सुखी संसाराला तडे जाणे सुरू झाले. सोमवारी सकाळी दारू पिण्यावरून दोघांत वाद झाला. गुलनाजने माहेरी जाण्याची धमकी दिली. संतापलेल्या हरीशने तिला निघून जाण्यास सांगितले. गुलनाजही रागाच्या भरात माहेरी गेली. पत्नीच्या विरहात हरीशने खूप दारू ठोसली. त्यानंतर घरात छताच्या बल्लीला साडीने गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
पप्पा छताला अडकले..!
गुलनाज रविवारी माहेरी गेल्यानंतर मुलगी मुस्कान (9) वडिलाला बघण्यासाठी घरी आली. तिने आवाज दिला असता प्रतिसाद मिळाला नाही. घरात गेली असता, वडील छताला गळफास घेऊन अडकलेल्या स्थितीत आढळले. ती पळतच आईकडे गेली. घडलेला प्रकार सांगितला.
|